कल्याण : कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या (Bakri Eid) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धार्मिक वाद उफाळून आला असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर नमाज अदा करण्यासंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन (Protest) करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही कार्यकर्ते बॅरिकेड्सवर (Barricades) चढल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
https://prahaar.in/2026/05/28/nashik-approval-for-works-worth-rs-6162-crore-for-kumbh-mela/
कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर असून किल्ल्याच्या पायथ्याशी ईदगाह आहे. त्यामुळे या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना जोडल्या गेल्या आहेत. गेल्या अनेक दशकांपासून या जागेवरून दोन्ही समाजांमध्ये वाद सुरू असून हा विषय न्यायप्रविष्ट आहे. हिंदू संघटनांचा दावा आहे की, येथे मूळ दुर्गा देवीचं मंदिर असून किल्ला हा हिंदूंच्या श्रद्धेचं प्रमुख केंद्र आहे. तर मुस्लिम समाजाकडून या परिसरात ईदगाह असल्याचा दावा केला जातो.
https://prahaar.in/2026/05/28/pune-drink-and-drive-case/
दरवर्षीप्रमाणे यंदाही बकरी ईदच्या दिवशी प्रशासनाकडून दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू भाविकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच वर्षभरातील इतर दिवशी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना करण्यास मनाई असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं. आंदोलनादरम्यान (Protest) कार्यकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर आरती करत घोषणाबाजी केली. काही कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा तैनात केली.
दुर्गाडी किल्ल्यावरील हा वाद गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. १९८२ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू भाविकांवरील प्रवेशबंदीला विरोध दर्शवला होता. त्यानंतर तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी १९८६ पासून ‘घंटानाद आंदोलन’ सुरू केलं. ही परंपरा आजही सुरू असून दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी शिवसैनिक दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन करताना दिसतात. गेल्या काही वर्षांत शिवसेनेचे दोन्ही गट येथे आंदोलन करत आहेत. यंदा भाजपनेही या आंदोलनात सहभाग घेतल्याने या मुद्द्याला अधिक राजकीय रंग चढल्याचं पाहायला मिळत आहे.
https://prahaar.in/2026/05/28/water-metro-the-first-water-metro-arrives-in-mumbai/
दरम्यान, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ला परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलासह मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांकडून परिसरावर ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे.
दुर्गाडी किल्ल्याचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित असून अंतिम निकाल येईपर्यंत प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात नियम लागू केले जात आहेत. मात्र दरवर्षी बकरी ईदच्या काळात या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण होत असल्याने प्रशासन आणि पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्थेचं मोठं आव्हान उभं राहत आहे.