डोंबिवली : डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिराच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता भाजपा नेत्यांच्या नव्या भूमिकेमुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्य सरकारने पिंपळेश्वर मंदिर परिसरातील सुमारे ४ एकर २५ गुंठे जमीन मंदिर ट्रस्टच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक भूमिका घेत थेट दुर्गाडी किल्ला आणि मलंगगडचा मुद्दा पुढे आणला आहे.
https://prahaar.in/2026/05/28/mistreatment-of-indians-in-us-threatened-saying-get-out-of-our-country/
मंगळवारी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपळेश्वर मंदिरात आरती करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले होते. त्यानंतर बुधवारी भाजपाच्या वतीनेही मंदिर परिसरात आरतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपाने पिंपळेश्वर मंदिराच्या लढ्यात आपलेही मोठे योगदान असल्याचा दावा केला.
कार्यक्रमादरम्यान भाजपा नेते दीपेश म्हात्रे यांनी म्हटले की, “ये तो अभी झांकी है, दुर्गाडी आणि मलंगगड बाकी आहे,” असे वक्तव्य करत त्यांनी आगामी काळात भाजपाची भूमिका आणखी आक्रमक असणार असल्याचे संकेत दिले.
https://prahaar.in/2026/05/28/police-crackdown-on-cow-smugglers-in-chhatrapati-sambhajinagar-44-accused-arrested/
दुर्गाडी किल्ला आणि मलंगगड हे दोन्ही धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या संवेदनशील विषय मानले जातात. त्यामुळे दीपेश म्हात्रे यांच्या या विधानानंतर कल्याण-डोंबिवली परिसरात पुन्हा एकदा हिंदुत्व आणि धार्मिक मुद्द्यांवरून संघर्ष पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपने पिंपळेश्वरनंतर आता दुर्गाडी आणि मलंगगडसारख्या विषयांवरही लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट संकेत या कार्यक्रमातून मिळाले. दरम्यान, पिंपळेश्वर मंदिराच्या जमिनीचा प्रश्न सुटल्याने स्थानिक भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.