उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; दिलीतील गुप्त दौऱ्याबाबत केले भाष्य
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत असलेल्या गुप्त दिल्ली दौऱ्यावरून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच अखेर पडदा हटवला आहे. आपण दिल्लीत जाऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची जाहीर कबुली त्यांनी दिली असून, महायुतीचे घटक पक्ष म्हणून एनडीएच्या शीर्ष नेत्यांना भेटण्यात काहीही चुकीचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
https://prahaar.in/2026/05/26/sanjay-rathore-rs-80000-stolen-from-shiv-sena-minister-sanjay-rathores-office/
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणालाही थांगपत्ता लागू न देता अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांचा हा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आल्याने महायुतीमध्ये नक्की काय चालले आहे, जागावाटपावरून काही खटके उडाले आहेत का, की मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही खलबते सुरू आहेत, यावरून तर्क-वितर्क लढवले जात होते. याविषयी शिंदे यांनी भाष्य केले आहे. शिंदे म्हणाले, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा आणि अंतर्गत मतभेद या विरोधकांच्या मनातील कल्पना आहेत. आम्ही एनडीएचे प्रमुख घटक आहोत आणि आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना धूळ चारण्यासाठी पूर्ण ताकदीने एकत्र उतरणार आहोत. केंद्र आणि राज्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठीच हा दौरा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.