पुणे : पुण्यातील गँगवॉर आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचले असून, तुरुंगात असतानाही बंडू आंदेकर टोळीचे नेटवर्क सक्रिय असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. बंडू आंदेकर आणि त्याचे साथीदार कारागृहात असतानाही बाहेरच्या गुन्हेगारी हालचालींवर नियंत्रण ठेवत असल्याच्या चर्चेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तुरुंगातूनच खून, हल्ले आणि सूडाच्या कारवायांचे आदेश दिले जात असल्याचा आरोप पुढे आल्याने कारागृह प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळीयुद्ध अधिकच भडकले. या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने नवीन आणि धोकादायक पद्धत अवलंबल्याचे समोर येत आहे. मुख्य आरोपी तुरुंगात असल्याने त्यांच्यापर्यंत थेट पोहोचणे शक्य नसल्याने, त्यांच्या कुटुंबियांना आणि जवळच्या नातेवाईकांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे टोळीयुद्ध आता वैयक्तिक सूडातून कुटुंबियांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.
https://prahaar.in/2026/05/21/gunfire-at-kailas-colony-square-in-ulhasnagar/
कल्याणी कोमकर यांनी केलेल्या आरोपांनुसार, बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर हे तुरुंगातून फोनच्या माध्यमातून बैठका घेत आहेत. या बैठकीतून बाहेरील हालचाली नियंत्रित केल्या जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे आरोप खरे ठरल्यास कारागृहातील सुरक्षा व्यवस्था आणि कैद्यांवर असलेले नियंत्रण यावर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात.
https://prahaar.in/2026/05/21/egg-donation-performed-a-staggering-37-times-5000-page-chargesheet-filed-in-badlapur-case-15-individuals-booked/
वनराज आंदेकर हत्या प्रकरणानंतर घडलेले हे तिसरे मोठे प्रकरण मानले जात आहे. याआधी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर समीर काळेचा भाऊ गणेश काळे यालाही लक्ष्य करण्यात आले. आता नाशिक कारागृहात असलेल्या आकाश म्हस्केचा भाऊ अक्षय म्हस्के याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या सलग घटनांमुळे पुण्यातील टोळीयुद्ध अधिक रक्तरंजित होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
https://prahaar.in/2026/05/21/success-in-saving-%e2%82%b9100-crore-in-cyber-crimes-in-mumbai/
बालाजीनगर गोळीबार प्रकरणात बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, तुरुंगातून सुरू असलेल्या कथित फोन मीटिंग्स, बाहेरील संपर्क आणि या नेटवर्कमागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे पोलिसांसमोर या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून गँगवॉर थांबवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.