राजस्थान : आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सने ११ पैकी ६ सामने जिंकत १२ गुणांसह गुणतालिकेत सहावे स्थान मिळवले आहे. अद्याप त्यांचे तीन सामने व्हायचे आहेत. राजस्थानकडून २०२५ मध्ये पदार्पण केलेल्या वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत आयपीएलचे १८ सामने खेळून ६९२ धावा केल्या आहेत. यात १०३ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलमध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. यंदाच्या हंगामात ११ सामन्यांत ४४० धावा करणाऱ्या वैभवने याच वर्षी १०३ ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली आहे. यंदाच्या वर्षी त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत. तुफान फटकेबाजी करणाऱ्या वैभवचे कौतुक करतानाच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने एक वास्तव पण सांगितले.वैभव सूर्यवंशी छान खेळत आहे. आयपीएलमधील त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. पण त्याची खरी परीक्षा अजून व्हायची आहे. त्याचा पुढील प्रवास एवढा सोपा नसेल; असे एबी डिविलियर्स म्हणाला.
https://prahaar.in/2026/05/13/ederson-moraes-its-amazing-to-hear-ederson-has-been-playing-in-the-same-boxer-shorts-for-8-years/
नेमकं काय म्हणाला एबी डिविलियर्स ?
एबी डिविसलियर्स फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट या पॉडकास्टवर बोलताना म्हणाला, १५ वर्षे या वयात वैभव अशी कामगिरी करत असल्याचे बघून आश्चर्य वाटत आहे. वैभवने केवळ टी-२० क्रिकेटला प्राधान्य दिले तर तो टी -२० इतिहासात सर्वोत्तम खेळाडू होईल यात शंकाच नाही. पण टी-२० व्यतिरिक्त त्याने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्येही नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला तर त्याला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. टी-२० हा क्रिकेटचा अतिशय वेगवान प्रकार आहे. या प्रकारात कमी वेळात सामन्याचा निकाल लागतो. पण एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरीवर जोर द्यावा लागतो. संयम आणि सामर्थ्य यांची परीक्षा एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये होते. कसोटी क्रिकेटमध्ये मानसिकदृष्ट्या दीर्घकाळ टिकाव धरावा लागतो. थोडक्यात सांगायचे तर टी-२० च्या तुलनेत एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खूप वेगळे आहे. यामुळे टी-२० सारखेच खेळणे एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये कठीण आहे. शिवाय टी-२० च्या तुलनेत एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये जास्त उत्तम फिटनेसची गरज आहे. अशा वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जात एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळावे लागते. याच कारणांमुळे टी-२० मध्ये चमकदार कामगिरी केली तरी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये तशीच कामगिरी करणे कठीण आहे. वैभवला सर्व प्रकारचे क्रिकेट खेळायचे असेल तर त्याने या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आणि त्यांच्या देखरेखीत तयारी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्याने फक्त टी -२० खेळण्यासाठी नियोजन करून इतिहास घडवावा.