Home ताज्या घडामोडी ‘Deool Band-2’ Movie : शिर्डीत प्रवीण तरडेंचा मोठा निर्णय! ‘देऊळ बंद २’ची कमाई शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी

‘Deool Band-2’ Movie : शिर्डीत प्रवीण तरडेंचा मोठा निर्णय! ‘देऊळ बंद २’ची कमाई शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी

0
‘Deool Band-2’ Movie : शिर्डीत प्रवीण तरडेंचा मोठा निर्णय! ‘देऊळ बंद २’ची कमाई शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी
Deool Band 2 Movie

शिर्डी:  बहुप्रतीक्षित ‘देऊळ बंद – २’ (Deool Band-2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यंदा चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. “आता परीक्षा देवाची” अशी दमदार टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात एका महिला शेतकऱ्याची कथा मांडण्यात आली आहे. ही महिला थेट स्वामींचीच परीक्षा घेताना दिसणार असून, चित्रपटातून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारख्या गंभीर विषयावर भाष्य करण्यात आले आहे. आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीत, तर बदलत्या काळानुसार शेतीत बदल आणि अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याची गरज आहे, असा ठाम संदेश या चित्रपटातून देण्यात येणार आहे. हमीभाव, बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी, कृषी सेवा केंद्रांची परिस्थिती अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवरही चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/05/12/will-trisha-krishnan-enter-politics/

शेतकऱ्यांच्या व्यथा, संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील वास्तव मांडणाऱ्या ‘देऊळ बंद – २’ चित्रपटाची संपूर्ण टीम नुकतीच शिर्डीत साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाली. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासह संपूर्ण कलाकारांनी साईंच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी साई संस्थान प्रशासनाकडून टीमचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रवीण तरडे यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सर्वांच्याच मनात त्यांच्या विषयीचा आदर अधिक वाढला. ‘देऊळ बंद – २’ या चित्रपटातून होणारी कमाई शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी शिर्डीत केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा आणि बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत नवे पर्याय स्वीकारण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

https://prahaar.in/2026/05/12/raja-shivaji-movie-box-office-collection/

माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण तरडे म्हणाले, “सरकार बदलत जातात, पण शेतकऱ्यांचे प्रश्न कायम राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. आत्महत्या करून काहीही साध्य होत नाही. काळानुसार शेतीची पद्धत बदलली पाहिजे. ‘देऊळ बंद – २’ हा सिनेमा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. या चित्रपटाची कमाईही आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देणार आहोत.”

दरम्यान, ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता तब्बल काही वर्षांनंतर ‘देऊळ बंद – २’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, हा चित्रपट २१ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here