Home ब्रेकिंग न्यूज Raghav Chadha : ‘आप’ने आत्मचिंतन करण्याची गरज – राघव चड्ढा यांचा टोला

Raghav Chadha : ‘आप’ने आत्मचिंतन करण्याची गरज – राघव चड्ढा यांचा टोला

0
Raghav Chadha : ‘आप’ने आत्मचिंतन करण्याची गरज – राघव चड्ढा यांचा टोला
raghav chaddha

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सध्या अंतर्गत नाराजी आणि वादांच्या भोवऱ्यात अडकला असून, पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी व्यक्त केले आहे. पक्षातून मोठ्या प्रमाणावर नेते बाहेर पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

आम्ही घाबरून नाही तर निराश होऊन हा निर्णय घेतला :

शनिवारी (२५ एप्रिल) माध्यमांशी बोलताना राघव चड्ढा म्हणाले की, “जो कोणी ‘आप’शी जोडलेला होता, तो एकतर पक्ष सोडून गेला आहे किंवा सोडण्याच्या तयारीत आहे. आम्ही सात खासदारांनी मिळून पक्षाचा निरोप घेतला आहे. पक्ष नेतृत्व आमच्यावर घाबरल्याचा आरोप करत आहे, पण आम्ही घाबरून नाही तर निराश होऊन हा निर्णय घेतला आहे.”

ते पुढे म्हणाले की, पक्षाने सध्याच्या परिस्थितीकडे गंभीरतेने पाहणे गरजेचे आहे. “ही वेळ एकमेकांवर आरोप करण्याची नाही, तर आत्मपरीक्षण करण्याची आहे. पक्षात काय चुकतंय, लोकांचा विश्वास का कमी होत आहे, याचा सखोल विचार होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबत बोलताना त्यांनी ‘शीशमहल’ प्रकरणाचा उल्लेख केला. “दिल्ली निवडणुकीत ‘आप’च्या पराभवामागे ‘शीशमहल’ हा मोठा मुद्दा होता. त्या वेळी पक्षाची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर मलिन झाली होती. आता पुन्हा ‘शीशमहल २’ वाद समोर आला आहे, जे पक्षासाठी धोक्याची घंटा आहे,” असे ते म्हणाले.

https://prahaar.in/2026/04/26/confusion-during-white-house-dinner-trump-couple-immediately-exits-after-reports-of-shooting/

समोर आलेल्या कथित फोटोंबाबत भाष्य करताना राघव यांनी सांगितले की, “या नव्या निवासस्थानाचे फोटो पाहिल्यावर ते अत्यंत आलिशान असल्याचे स्पष्ट होते. सामान्य लोकांच्या अपेक्षांशी याचा काहीही संबंध दिसत नाही.”

यावरून त्यांनी पक्षाच्या उरलेल्या कार्यकर्त्यांबाबतही चिंता व्यक्त केली. “पक्षात जे मोजके प्रामाणिक कार्यकर्ते उरले आहेत, ते लोकांना काय उत्तर देणार? गल्ली-बोळात लोक ‘शीशमहल’बाबत प्रश्न विचारतील, तेव्हा त्यांना काय सांगायचं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या सर्व पार्श्वभूमीवर राघव यांनी पक्ष नेतृत्वाला थेट संदेश देत म्हटले की, “जनतेचा विश्वास परत मिळवायचा असेल, तर ‘आप’ने या सर्व मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करून योग्य ती पावले उचलली पाहिजेत.”