Home महाराष्ट्र कोकण ​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा
sawant wadi

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले

पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान

सावंतवाडी : सावंतवाडी शहराला काल मध्यरात्री १२ च्या सुमारास भीषण वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या वादळाने शहरातील अनेक भागांत मोठे नुकसान केले असून, झाडे कोसळणे, इमारतींवरील पत्रे उडणे अशा घटनांमुळे मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

https://prahaar.in/2026/04/24/maharashtra-weather-the-spell-of-rain-continues-in-maharashtra-warning-issued-for-unseasonal-showers-accompanied-by-heat-in-these-regions/

या नैसर्गिक आपत्तीमध्ये श्री पंचम खेमराज (एस.पी.) महाविद्यालयाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीचे कौलारू छत पूर्णपणे विस्कळीत झाले, तर नवीन इमारतीवरील पत्रे कागदासारखे हवेत उडून दूरवर फेकले गेले. काही पत्रे तर तीन मजली इमारत ओलांडून कॉलेजच्या मागील बाजूला जाऊन पडले. यावरून वाऱ्याच्या वेगाची भीषणता लक्षात येते.

शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्र्याचे छत उडून थेट एस.पी. कॉलेज परिसरात कोसळले. याशिवाय इमारतीच्या काचेच्या खिडक्या फुटून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, सावंतवाडी नगरपरिषदेने नुकतीच शहरातील जुन्या पत्र्यांच्या शेडचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही सूचना दिलेली असतानाच ही घटना घडल्याने शहरात चर्चा सुरू आहे. हे छत जर मोती तलावाच्या मुख्य रस्त्याकडे कोसळले असते, तर मध्यरात्रीही मोठी दुर्घटना घडली असती.

https://prahaar.in/2026/04/24/diva-chiplun-special-memu-express-good-news-for-the-people-of-konkan-diva-chiplun-special-memu-express-to-start-operations/

​विद्युत पुरवठा खंडित, शहरात अंधाराचे साम्राज्य

गुरुवारी सायंकाळपासूनच तालुक्यात विजांचा लखलखाट सुरू होता आणि आंबोली परिसरात पावसाने हजेरी लावली होती. रात्री १२ वाजता जेव्हा वादळ सुरू झाले, तेव्हा खबरदारीचा उपाय म्हणून आणि तांत्रिक बिघाडामुळे शहराचा विद्युत पुरवठा सुमारे २ तास खंडित झाला होता.

​ठिकठिकाणी पडझड आणि नुकसान

​राजवाडा व शिव उद्यान: राजवाडा येथील नारळाचे झाड कोसळून संरक्षक कठड्याचे नुकसान झाले, तर शिव उद्यानातील झाडे पडल्याने सौंदर्यीकरणाला धक्का बसला आहे.

​उभाबाजार: येथील एका घरावरील पत्रा उडून शेजारील अंगणात पडला.
​जाहिरात कमानी: आरपीडी परिसरातील जाहिरात कमानीही वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत.

​मोठा अनर्थ टळला

हे वादळ रात्रीच्या वेळी आले आणि रस्त्यावर वर्दळ नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. प्राथमिक अंदाजानुसार शहरात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सकाळी उशिरापर्यंत पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम सुरू होते.