पुणे : वाढत्या उन्हाळ्यामुळे थंड पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वॉटरपार्ककडे वळत असतानाच, शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ‘जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात’ वॉटर स्लाईडवरून घसरताना झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचे अर्धांग निकामी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पर्यटन केंद्रातील वॉटरपार्कमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा प्रचंड अभाव होता. स्लाईडवरून खाली येत असताना झालेल्या अपघातामुळे महिलेला गंभीर दुखापत झाली आणि तिला कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. वॉटरपार्क प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर हे संकट ओढवले आहे. या घटनेनंतर शिरूर पोलिसांनी संबंधित व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला असून, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वॉटरपार्कमध्ये जाताना केवळ मजा न पाहता तिथल्या सुरक्षेची खात्री करणे किती गरजेचे आहे, हेच या घटनेतून अधोरेखित होत आहे.
पाण्याची पातळी कमी अन् होत्याचं नव्हतं झालं…
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला…
https://prahaar.in/2026/04/08/nashik-womens-safety-issue-back-in-the-spotlight-6-accused-arrested-in-molestation-and-outraging-modesty-cases-sit-launches-investigation/
अश्विनी नप्ते यांचा भीषण अपघात झाल्यानंतर, त्यांना तातडीने मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या मोठ्या पर्यटन केंद्रात कोणतीही प्राथमिक वैद्यकीय सुविधा किंवा साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती. रक्ताच्या थारोळ्यात आणि वेदनेने विव्हळत असलेल्या अश्विनी यांना कोणतीही मदत न मिळाल्याने अखेर नातेवाईकांनी स्वतः खासगी रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात हलवले. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे नप्ते कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले असून त्यांचे हसते-खेळते घर उद्ध्वस्त झाले आहे. केवळ नफ्यासाठी पर्यटकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा संस्थांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. स्वप्नातही विचार केला नसेल असा भीषण शेवट या सहलीचा झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पर्यटन केंद्राचे मालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
याप्रकरणी किरण नप्ते यांनी दिलेल्या तक्रारीवरून ‘जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रा’चे मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून पर्यटकांच्या जिवाशी खेळ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वॉटरपार्क आणि पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असतानाच या घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असून, “वॉटरपार्कमध्ये जाणे खरोखर सुरक्षित आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ नफा कमवण्यावर भर देणाऱ्या पर्यटन केंद्रांवर प्रशासनाने कडक वॉच ठेवण्याची गरज आता व्यक्त होत आहे. शिरूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अशा बेजबाबदार व्यवस्थापनावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.