Home महाराष्ट्र पालघर Vasai – Virar Crime : वसई–विरारमध्ये मृतदेह सापडण्यांची मालिका सुरूच; १५ दिवसांत ६ घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Vasai – Virar Crime : वसई–विरारमध्ये मृतदेह सापडण्यांची मालिका सुरूच; १५ दिवसांत ६ घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Vasai – Virar Crime : वसई–विरारमध्ये मृतदेह सापडण्यांची मालिका सुरूच; १५ दिवसांत ६ घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
vasai virar crime news

वसई-विरार : वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात मृतदेह सापडण्याच्या घटनांनी गंभीर वळण घेतले असून, अवघ्या १५ दिवसांत सहा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रविवारी सायंकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्ग वरील विरार फाटा येथे सडलेल्या अवस्थेतील एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

कचऱ्याजवळ सडलेल्या अवस्थेत मृतदेह

स्थानिकांना दुर्गंधी आल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला असता कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक मृतदेह दिसून आला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मांडवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. हा मृत्यू नैसर्गिक, अपघाती की घातपात, याचा तपास सुरू आहे.

१५ दिवसांत सहा मृतदेह

गेल्या दोन आठवड्यांत या परिसरात सापडलेल्या मृतदेहांची मालिका चिंताजनक आहे.

२१ मार्च : शिरवली येथे महिलेचा कुजलेला मृतदेह; पती अटकेत
२३-२४ मार्च : धानिवबाग येथे ६ वर्षीय बालिकेचा विहिरीत मृतदेह
२६-२७ मार्च : पेल्हार फाटा येथे शिरच्छेद अवस्थेत पुरुषाचा मृतदेह
मार्च अखेर : नालासोपारा पश्चिम येथे नाल्यात अज्ञात महिलेचा मृतदेह
३०-३१ मार्च : फुलपाडा येथे अज्ञात इसमाचा मृतदेह
५ एप्रिल : विरार फाटा येथे सडलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सतत उघड होत असलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. “गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. निर्जन भाग, अपुरी प्रकाशयोजना आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव यामुळे गुन्हेगारांना वाव मिळत असल्याची तक्रारही नागरिक करत आहेत.

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

काही प्रकरणांत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी अनेक मृतदेहांची ओळख पटवणे अद्यापही आव्हानात्मक ठरत आहे. बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींचा आधार घेत तपास सुरू असून, या घटनांमागील सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वसई–विरार पट्ट्यात सलग सापडणारे मृतदेह ही गंभीर बाब ठरत असून, या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून कडक उपाययोजना आणि देखरेख वाढवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.