Home ब्रेकिंग न्यूज NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी रोहित पवारांकडून ५ कोटींचे पॅकेज?

NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी रोहित पवारांकडून ५ कोटींचे पॅकेज?

0
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी रोहित पवारांकडून ५ कोटींचे पॅकेज?

मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पाडण्यासाठी आणि पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी ५ कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ एका खासगी एजन्सीला दिले असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी मंगळवारी केला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पगार देऊन खोटे आरोप करण्यासाठी काही लोकांची विशेष नियुक्ती करण्यात आली असून, यामागे राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना चव्हाण म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्याने चिखलफेक केली जात आहे. तुतारी गटाचे स्वतःच्या पक्षाकडे जेवढे लक्ष नाही, त्यापेक्षा जास्त लक्ष आमच्या पक्षात फूट कशी पडेल आणि आमचे नेते बदनाम कसे होतील, याकडे आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतून ओबीसी, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक सेल वगळण्यात आल्याचा दावा नुकताच शरद पवार गटाच्या एका प्रवक्त्याने केला होता. यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्राची प्रतच माध्यमांना दाखवली. “आमच्या घटनेत स्थापनेपासूनच फादर बॉडी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सेवादल हे पाचच फ्रंटल विभाग आहेत. ओबीसी किंवा सामाजिक न्याय हे विभाग कधीही ‘फ्रंटल’मध्ये नव्हते, तर ते ‘सेल’ म्हणून कार्यरत आहेत. कलम ३० चा संदर्भ देऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे, मात्र कलम २८.१ मध्ये या सर्व सेलचा स्पष्ट उल्लेख आहे. रोहित पवारांची टीम जाणीवपूर्वक अर्धीच माहिती पसरवून आमची प्रतिमा मलिन करत आहे,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

स्वतःच्या आमदारांकडे लक्ष द्या : रोहित पवार यांनी आमच्या पक्षावर लक्ष देण्याऐवजी आपल्या आमदारांकडे लक्ष द्यावे. मोहोळचे आमदार कोणत्या पक्षाचे कार्यक्रम घेतात आणि सोलापूरचे लोकप्रतिनिधी कोणाच्या बॅनरखाली काम करतात, हे त्यांनी तपासावे, असे ते म्हणाले. तसेच, आमच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सक्षम आहेत, त्यामुळे त्यात इतरांनी लुडबुड करू नये. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसवर विनाकारण टीका केली, तर त्याला ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, , असा इशाराही त्यांनी दिला.