Home क्रीडा भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

0
भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने धावांचा डोंगर रचला. टीम इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. भारताने २० षटकांत चार बाद २५६ धावा केल्या. भारताच्या सहा फलंदाजांनी मिळून तब्बल १७ षटकार मारले. विशेष म्हणजे भारताच्या प्रत्येक फलंदाजाने आज १५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा काढल्या आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील एका सामन्यातील एका डावातल्या सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत भारताने विक्रम नोंदवला.

भारताकडून संजू सॅमसनने १५ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २४ धावा केल्या. अभिषेक शर्माने ३० चेंडूत प्रत्येकी ४ षटकार आणि ४ चौकार मारत ५५ धावा केल्या. ईशान किशनने २४ चेंडूत ३८ धावा करताना १ षटकार आणि ४ चौकार मारले. कर्णधार सूर्यकुमार यादवने १३ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकार मारत ३३ धावा केल्या. हार्दिक पांड्याने २३ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकार मारत नाबाद ५० धावा केल्या तर तिलक वर्माने १६ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकार मारत नाबाद ४४ धावा केल्या. हार्दिक आणि तिलकने ३१ चेंडूत १६.२५ च्या रनरेटने ८४ धावांची नाबाद भागीदारी केली. झिम्बाब्वेने टाकलेल्या एवढ्या चेंडूंपैकी फक्त २६ चेंडू निर्धाव होते उर्वरित प्रत्येक चेंडूवर भारताने किमान एक धाव काढली होती.

सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सूर्याने आतापर्यंत १४८ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या १४० डावांत ३४.१ च्या सरासरीने ४०२४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर चार शतके आणि २९ अर्धशतके आहेत.