Home ब्रेकिंग न्यूज स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होणार- कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा

स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होणार- कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा

0
स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होणार- कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा

उद्योगांना उपयुक्त ठरणारी देशातील पहिली ‘ ए आय लिविंग लॅब’ महाराष्ट्रात सुरु

महाराष्ट्र रतन टाटा कौशल्य विद्यापीठात मंत्री लोढा यांच्या हस्ते लॅबचा शुभारंभ

मुंबई : उद्योग समूह आणि लघु उद्योगांना लाभदायक ठरणारी देशातील पहिली ‘ए आय लिविंग लॅब” महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या लॅब चे आज महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयात उदघाटन करण्यात आले. जर्मनीच्या सहकार्याने रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा हा अभिनव उपक्रम आहे.

जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ. बार्बेल कॉफ्लर,राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टॉप हेलिर ,जी आय झेड चे संचालक उल्करे एबेलींग यांच्या उपस्थित रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या (RT-MSSU) सेंट्रल हॉल येथे ‘लिव्हिंग लॅब’चे संबंधित विविध सामंजस्य करारही करण्यात आले आहेत.

कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी म्हटले की, प्राचीन भारतात आपल्या उद्योगात तत्कालीन प्रगत तंत्रज्ञान वापरात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. छोट्या छोट्या उद्योगांच्या जोरावरच भारत त्या काळी एक समृद्ध राष्ट्र म्हणून जगभरात व्यापार करत असे. याच स्वदेशीच्या संकल्पनेवर प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी कोरोना आपत्तीत जगभरातल्या ७५ पेक्षा अधिक देशांना स्वदेशी लस देऊन वैश्विक मैत्रीची भूमिका घेतली. यावर ते थांबले नाहीत तर अधिक अद्ययावत तंत्रज्ञान भारतात आणून स्वदेशी उद्योगांना चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर्मनीच्या सहकार्याने सुरु होत असलेला ‘ ए आय लिविंग लॅब’ हे त्याचेच द्योतक असून स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत नक्कीच विश्वगुरू होणार असल्याचे मंत्री लोढा यांनी म्हटले. त्याचबरोबर विकासाच्या दूरदृष्टीतून राज्याला प्रगतीच्या शिखरावर पोहचवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रयत्न करत आहेत. फडणवीस यांच्याच मार्गदर्शनात कौशल्य विभागाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात असून तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही लोढा म्हणाले.

मानवजातीच्या भविष्याला आकार देण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए आय ) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपण सर्वजण मिळून याचा योग्य वापर केला, तर विज्ञानातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवणे, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी दूर करणे शक्य होईल.उद्योग क्षेत्रात ए आय मुळे मोठे बदल घडत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि संस्था परस्पर सहकार्य करून नवीन संशोधन आणि नवकल्पना राबवत आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून, लाखो व्यावसायिक आणि तज्ज्ञ यामध्ये कार्यरत असल्याचे जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ. बार्बेल कॉफ्लर यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर कृत्रिम बुद्धिमत्ता एक प्रकारची औद्योगिक क्रांतीच आहे, जी केवळ पर्यायी नाही तर जगभरात अत्यावश्यक बनत आहे. अर्थव्यवस्थेची रचना आणि काम करण्याच्या पद्धती यात मूलभूत बदल होत आहेत. नवीन पिढी ए आय चा प्रभाव अधिक वेगाने स्वीकारत असून आणि त्यात मोठ्या संधी पाहत असल्याचे राज्याचे मुख्य सचिव श्री.राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती अपूर्वा पालकर यांनी ‘AI लिविंग लॅब’ चे पैलू उलगडून दाखवले. हा उपक्रम जर्मनी आणि भारत यांच्यातील कौशल्य विकास व कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए आय ) क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करणार आहे. उद्योग, विद्यापीठे आणि शासन यांना एकत्र आणून प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे. ‘लिव्हिंग लॅब’ ही संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील आव्हानांवर काम करण्याची संधी देते. यात विद्यार्थी, प्राध्यापक आणि उद्योग तज्ञ एकत्र येऊन अडचणींचे निदान करू शकतात , त्यांचे विश्लेषण करतात आणि व्यवहार्य उपाय सुचविण्याची कुशलता ही यामुळे वाढीस लागून देशभरातील उद्योगांना याचा लाभ होणार असल्याचे पालकर यांनी स्पष्ट केले. सध्या जर्मनीच्या सहकार्याने तिथल्या पाच कंपन्या या लॅब ला सहकार्य करणार आहेत. त्यातून तंत्रज्ञानाचे आदण प्रदान होणार आहे.

जर्मनीतल्या लिपझिक विद्यापीठ, SEPT कॉम्पिटन्स आणि महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ ए आय लिविंग लॅब’ ‘ उपक्रम राबवण्यात येत असून महाराष्ट्रातील अक्युरेट इंडस्ट्रियल कंट्रोल्स लिमिटेड, लाईटेक्स इलेक्ट्रिकल, अश्विनी मॅग्नेटस आणि पीएमटी मशीन या कंपन्यांनी रतन टाटा विद्यापीठासोबत सहकार्य करण्याचा करार केला आहे. या उपक्रमातून विविध उद्योग क्षेत्रातील अडचणींवर ए आय तंत्रज्ञानाद्वारे उपाययोजना आणि पुढील आवश्यक नियोजन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.