Home क्रीडा ईशान, सूर्या, शिवम, तिलक, रिंकूमुळे भारताने पाकिस्तानपुढे ठेवले मोठे लक्ष्य

ईशान, सूर्या, शिवम, तिलक, रिंकूमुळे भारताने पाकिस्तानपुढे ठेवले मोठे लक्ष्य

0
ईशान, सूर्या, शिवम, तिलक, रिंकूमुळे भारताने पाकिस्तानपुढे ठेवले मोठे लक्ष्य

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताने ईशान, सूर्या, शिवम, तिलक, रिंकूमुळे पाकिस्तानपुढे मोठे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २० षटकांत सात बाद १७५ धावा केल्या आणि पाकिस्तानला २० षटकांत १७६ धावा करण्याचे लक्ष्य दिले.

भारताकडून ईशान किशनने सर्वाधिक ७७ धावा केल्या. त्याने ४० चेंडूत ३ षटकार आणि १० चौकार मारत ही कामगिरी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने २९ चेंडूत ३२ धावा केल्या. शिवम दुबेने (धावबाद) १७ चेंडूत २७ तर तिलक वर्माने २४ चेंडूत २५ धावा केल्या. रिंकु सिंगने फक्त ४ चेंडू खेळून एक षटकार आणि एक चौकार मारत नाबाद ११ धावा केल्या.

आजारपणातून उठल्यानंतर थेट पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरलेल्या अभिषेक शर्माला पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने शाहीन आफ्रिदीकरवी शून्यावर झेलबाद केले. हार्दिक पंड्याही शून्य धावा करून परतला. त्याला सईम अयुबच्या चेंडूवर बाबर आझमने झेलबाद केले. अक्षर पटेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर सईम अयुबकडे झेल देऊन परतला. भारताचे सात पैकी तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. पाकिस्तानकडून सईम अयुबने तीन तर सलमान आगा, उस्मान तारिक आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

‘ई’शान शो!

ईशान किशनने फलंदाजीतील शानदार शो दाखवून दिला. त्याने दबावात तुफान फटकेबाचीचा नजराणा पेश करत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. ईशान किशनचे या टी ट्वेंटी विश्वचषकातील हे दुसरे अर्धशतक होते. त्याची ही खेळी भारतासाठी मोठा दिलासा देणारी आणि पाकिस्तानी गोलंदाजांचे खांदे पाडणारी अशी आहे. या खेळीसह त्याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. एवढेच नाही तर भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यात त्याच्या भात्यातून तिसरे जलद अर्धशतक पाहायला मिळाले. भारतीय संघाने पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावरही ईशान किशन याने आपल्या नैसर्गिक धाटणीत तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. तो शतकी खेळीसह मोठा धमाका करेल, असे चित्र निर्माण झाले असताना भारताच्या डावातील ९ व्या षटकात सईम अयूबच्या चौथ्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. ८८ धावांवर भारताने ही विकेट गमावली. त्याने ४० चेंडूत ७७ धावा केल्या.

ईशान किशन टी वर्ल्डकप २०२६ मधील कामगिरी

  • ७ फेब्रुवारी विरुद्ध अमेरिका – २० धावा
  • १२ फेब्रुवारी विरुद्ध नामिबिया – ६१ धावा
  • १५ फेब्रुवारी विरुद्ध पाकिस्तान – ७७ धावा