Home ब्रेकिंग न्यूज सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात बिबट्याचा वावर

सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात बिबट्याचा वावर

0
सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात बिबट्याचा वावर

सुधागड-पाली  : सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या आणि त्याच्या पिल्लांच्या दर्शनामुळे परिसरात दहशत पसरली आहे. त्यामुळे वन विभागाने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध ठिकाणी जनजागृतीचे फलक लावण्यात येत आहेत. सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत आहे. म्हैस शोधण्यासाठी गेलेल्या शेतकरी गणपत बरगे यांचा बिबट्याशी आमनासामना झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. वनविभागाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली असून, पाच्छापूर गावात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे बिबट्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच, नागरिकांना सुरक्षिततेसाठी आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. शनिवारी (दि.२४) वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पाच्छापूर येथे पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की, बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे बसवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जाईल आणि आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे यांनी सांगितले की, “बिबट्याचा वावर परिसरात असल्याने आम्ही ट्रॅप कॅमेरे बसवून हालचालींवर लक्ष ठेवत आहोत. वनविभाग परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असून आवश्यक ती उपाययोजना करत आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडून तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता विभागाने ट्रॅप कॅमेरे बसवून आणि सतत निरीक्षण ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पाच्छापूरसह आजूबाजूच्या आसानवाडी, पोटलज आणि धोंडसे या गावांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. याची दखल घेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेटी देऊन पगमार्क्सची पाहणी केली. तसेच बिबट्याशी सामना झाल्यास काय करावे, याबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.गावातील मुख्य चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी माहितीपर फलक लावून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.