Home ब्रेकिंग न्यूज राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता – मंत्री जयकुमार रावल

राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता – मंत्री जयकुमार रावल

राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता – मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत पणन मंत्री जयकुमार रावल यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा थेट लाभ राज्यातील लाखो तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, सन २०२५-२६ या हंगामासाठी महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तुरीची खरेदी ८,००० रुपये प्रति क्विंटल या किमान हमीभावाने केली जाणार आहे. या खरेदीसाठी २० जानेवारी २०२६ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.

ही खरेदी प्रक्रिया नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या केंद्रीय संस्थांमार्फत राज्य सरकारच्या समन्वयाने राबविण्यात येणार असून, त्यासाठी राज्यभरात ९३४ खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.यावर्षी राज्यातील तूर उत्पादनाचा अंदाज १३.५१ लाख मेट्रिक टन इतका आहे. तसेच मागील हंगामात राज्यातील ८५ हजार शेतकऱ्यांकडून १३ लाख ३३ हजार १२८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती, अशी माहितीही मंत्री रावल यांनी दिली.

तूर खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व जलद गतीने राबवावी, अशा स्पष्ट सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास राज्यातील १०० टक्के तूर खरेदीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असेही मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.