Home साप्ताहिक अर्थविश्व Explainer: भाजप महायुती बीएमसी जिंकल्यास अर्थकारणावर सकारात्मक परिणाम? काय म्हणाले तज्ज्ञ वाचाच

Explainer: भाजप महायुती बीएमसी जिंकल्यास अर्थकारणावर सकारात्मक परिणाम? काय म्हणाले तज्ज्ञ वाचाच

Explainer: भाजप महायुती बीएमसी जिंकल्यास अर्थकारणावर सकारात्मक परिणाम? काय म्हणाले तज्ज्ञ वाचाच

मोहित सोमण: प्रामुख्याने आज २९ महानगरपालिकांचा निर्णय लागताना खरं तर मुंबईसह संपूर्ण देशाचे लक्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीकडे लागले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, व रिपाईसह इतर मित्रपक्षांची महायुती असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशी आघाडी एकमेकांविरुद्ध महापालिकेत सामोरे जात आहेत. त्यामुळेच एकीकडे कोण जिंकेल त्यापेक्षा त्याचा अर्थकारणावर काय परिणाम होईल याचा परामर्श घेतला गेला पाहिजे.

प्रामुख्याने केंद्रात राज्यात भाजपप्रणित एनडीएचे शासन आहे. त्यामुळे केंद्रासह राज्यात व महानगरपालिकेत सत्ता असल्यास या ट्रिपल इंजिनचे सरकार आर्थिक धोरण आखण्यात लाभदायक ठरणार आहे असे मानणारा मोठा औद्योगिक वर्ग आहे. दुसरीकडे विरोधात असलेले पक्ष मराठी अस्मिता व भाजपच्या धोरणावर टीका करुन स्वतः हिताचे सरकार आणण्याचा दावा विरोधक करत आहे. या दोन्ही पक्षांच्या खडाजंगीत मुंबईकरांना काय अपेक्षित आहे याचा परामर्श केवळ औद्योगिक व राजकीय धोरणाला वगळून घेता येणार नाही. मुंबई ही आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते. जवळपास ७५००० कोटीचे बजेट असलेली महापालिका गोवा आसाम यांसारख्या राज्यांच्या एकूण बजेट पेक्षाही श्रीमंत महानगरपालिका आहे. त्यामुळे सहाजिकच मुंबईकडे जगभरातील लोकांचे लक्ष लागलेले असते.

कुठल्या पक्षाने काय केले यापेक्षा पायाभूत सुविधा, कोस्टल रोड, सेफ्टी फिचर्स, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प उभारणी, ट्रॅफिक कोंडी, फेरीवाले, वाढती गर्दी, अपेक्षित लोकल ट्रेनच्या फेऱ्या, मुंबईतील साचणारे पाणी, मिठी नदीचा प्रश्न, शाश्वत हरित विकास असे शेकडो मुद्यावर महानगरपालिकेचे निवडणूक होणे अपेक्षित असताना सहाजिकच कोण जिंकल्यावर गुंतवणूकीत वाढ होऊ शकते हा प्रश्न स्वाभाविकच आहे.

दुसरीकडे बाजार विश्लेषकांच्या मते, महायुतीचा निर्णायक विजय गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवू शकतो असे सांगितले जात आहे. आणि भारताच्या आर्थिक राजधानीतील व्यावसायिक भावनांवर सकारात्मक परिणाम करू शकतो कारण तो राजकीय स्थिरता आणि विकास-केंद्रित प्रशासनावर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत देतो. अनेकदा राजकीय स्थिरता ही औद्योगिक धोरणासाठी आवश्यक असते. त्यामुळे सुसंघटित पद्धतीने विकास विना अडथळा करता येतो. अर्थातच त्यामुळे आर्थिक तज्ञांच्या मते भाजपा जिंकल्यास त्याचा मोठा सकारात्मक फायदा गुंतवणूकदारांना व नागरिकांना होऊ शकतो असे वर्तवले जात आहे. महाविकास आघाडी किंवा विरोधक, तिसरी आघाडी आल्यास मात्र विकासाला खिळ बसणार का हा देखील यक्षप्रश्न आहे असे आर्थिक वर्तुळात म्हटले जात आहे.

मात्र अनेकदा राजकीय पक्षांकडून अवास्तव घोषणा करुन लोकप्रिय प्रचारासाठी ताळेबंदीची गणिते बिघडली जातात. त्यामुळे या निमित्ताने जर सत्ताधारी पक्ष जिंकल्यास त्यांचे काय परिणाम होतील हे पाहणेही परिणामकारक ठरणार आहे. याउलट निरीक्षकांच्या मते प्रचारादरम्यान केलेली विविध ‘मोफत योजनांची खैरात व आश्वासने दिली जातात. उदाहरणार्थ महिलांसाठी बस प्रवासात सवल मुंबईच्या करदात्यांवर मोठा आर्थिक भार टाकू शकतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थकारणावर ताण निर्माण करू शकतात तो एक स्वतंत्र विषय आहे. त्यामुळेच तत्पूर्वी हे निकाल अर्थकारणावर शेअर बाजारात व सामान्य मुंबईकरांवर काय परिणाम करतील यावर काय म्हणाले तज्ञ अजित भिडे?

प्रहारने अर्थतज्ज्ञ व शेअर बाजाराचे विश्लेषक अजित भिडे म्हणाले आहेत की,’ मुंबई महापालिकेत महायुतीचा विजय झाल्यास स्थिर आर्थिक धोरणामुळे सामान्यांना पायाभूत सुविधेत वाढ होऊ शकते. त्यामुळे आगामी ३०००० कोटींची पायाभूत सुविधांची अंमलबजावणी वेगवान होणे त्यामुळे शक्य होईल. तसेच कासारवडवली वडाळा मेट्रो प्रकल्प व इतर रखडलेले प्रकल्प हे अधिक सुरळीत होतील. ठाकरे बंधूंकडून ज्या प्रकल्पाला विरोध झाला त्यातील अडथळे महायुती आल्यास दूर होतील. त्यामुळे विरोध झाला तरी त्यात अडकाठी करु शकणार नाहीत. कारण ते सरकारमध्ये नाहीत राज्यातही नाहीत केंद्रातही नाहीत व भाजप जिंकल्यास इथेही नसतील. दुपारी २ पर्यंत चित्र स्पष्ट होईल. दोन तीन राज्यांच्या एकत्रित बजेटपेक्षा मुंबईचा अर्थसंकल्प अधिक आहे त्यामुळे ही निवडणूक भाजप जिंकल्यास त्याचा सकारात्मक परिणाम मुंबईत दिसेल बाकी चित्र निकालानंतरच स्पष्ट होईल त्यामुळे अधिक भाष्य आताच्या घडीला करणे योग्य ठरणार नाही.’