मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या दादर परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘नवा टिळक पूल’ लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. १९२५ मध्ये ब्रिटिशांनी बांधलेल्या जुन्या पुलाची जागा आता एक आधुनिक केबल-स्टेड पूल घेणार असून, याचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. महानगरपालिकेच्या नियोजनानुसार, या वर्षाअखेरपर्यंत हा पूल प्रवाशांसाठी खुला केला जाईल.
ऐतिहासिक पुलाचा १०० वर्षांचा प्रवास थांबणार
https://prahaar.in/2026/01/10/velocity-of-violence-speeding-audi-leaves-trail-of-destruction-in-jaipur-as-1-killed-and-16-injured/
दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा टिळक ब्रिज मुंबईतील एक महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, शंभर वर्षे पूर्ण होत आलेल्या या पुलाची अवस्था बिकट झाली होती. २०१९ मध्ये पालिकेच्या ऑडिटमध्ये हा पूल ‘धोकादायक’ आणि ‘वापरण्यास अयोग्य’ ठरवण्यात आला होता. विशेषतः गणेशोत्सवादरम्यान या पुलावर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवीन पुलाची उभारणी करणे पालिकेसाठी अनिवार्य ठरले होते. मुंबई महानगरपालिकेने एक विशेष धोरण आखून जुन्या पुलाला समांतर असा नवीन केबल-स्टेड पूल बांधण्यास सुरुवात केली. यामुळे नवीन पुलाचे काम सुरू असतानाही जुना पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवता आला, ज्याचा फायदा प्रवाशांना झाला आणि वाहतुकीचा खोळंबा टळला. सध्याच्या नियोजनानुसार, नवीन पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला केल्यानंतरच ब्रिटीशकालीन जुना पूल पाडण्यात येणार आहे.
दादरचा नवा ‘टिळक ब्रिज’ ६ पदरी होणार!
मुंबईच्या मध्यवर्ती दादर भागातील महत्त्वाचा दुवा असलेला टिळक पूल आता अधिक प्रशस्त आणि आधुनिक रूपात साकारला जात आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या पुलाचे बांधकाम दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार असून, एकूण ६ पदरी (6 Lane) असा हा भव्य पूल असेल. २०२८ पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. सध्या या पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून ते ७० टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्यात ३ पदरी (3 Lane) पुलाची उभारणी केली जात आहे. विशेष म्हणजे, पुलाच्या पायाचे (Foundations) सर्व काम पूर्ण झाले असून, सध्या गर्डर आणि सुपरस्ट्रक्चर बसवण्याचे काम वेगात सुरू आहे. हा पहिला ३ पदरी टप्पा एप्रिल २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने एक विशेष रणनीती आखली आहे. पहिला ३ पदरी पूल सुरू झाल्यानंतरच १९२५ चा ब्रिटीशकालीन जुना टिळक पूल पाडण्यात येईल. जुना पूल जमीनदोस्त केल्यानंतर त्याच जागी दुसऱ्या टप्प्यातील आणखी ३ पदरी पुलाचे काम सुरू होईल. या दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे १८ महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून, संपूर्ण ६ पदरी पूल २०२८ पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत पूर्णपणे दाखल होईल.