हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निधी अग्रवाल (Nidhi Agrawal) हिला एका सार्वजनिक कार्यक्रमात अतिउत्साही चाहत्यांच्या भीषण गर्दीचा सामना करावा लागला. सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘द राजा साब’ या चित्रपटातील ‘सहना सहना’ गाण्याच्या लाँचिंगसाठी निधी एका मॉलमध्ये पोहोचली होती. मात्र, कार्यक्रमाहून परतताना चाहत्यांच्या गर्दीने मर्यादा ओलांडल्यामुळे निधी अग्रवालची सुरक्षितता धोक्यात आली होती.
नेमका प्रकार काय घडला?
What a shame ! pic.twitter.com/cnzkMfZkaB
— Prashanth Rangaswamy (@itisprashanth) December 17, 2025
इव्हेंट संपवून बाहेर पडत असताना, निधीला पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. काही क्षणातच शेकडो लोकांनी तिला चहूबाजूंनी वेढले. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, त्या अफाट जनसागरात निधी अक्षरशः दिसेनाशी झाली होती. तिच्यासोबत असलेल्या वैयक्तिक अंगरक्षकांनी (Bodyguards) कडे करण्याचा प्रयत्न केला, पण लोकांच्या धक्काबुक्कीपुढे त्यांची शक्ती अपुरी पडली. यावेळी अनेक जण तिला स्पर्श करण्याचा आणि सेल्फीसाठी तिच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते, ज्यामुळे निधी प्रचंड अस्वस्थ आणि घाबरलेली दिसत होती.
नेटकऱ्यांचा संताप आणि तीव्र प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘गल्ट’ने शेअर केलेल्या या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे, “थोडी लाज वाटू द्या, ती किती संकटात आहे हे दिसत नाही का?”, “तुम्ही तिचे चाहते नाही, तर तुम्ही तिला त्रास देत आहात.”, “सेलिब्रिटींना आदर द्यायला शिका, कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुमार होते.” प्रत्यक्षदर्शींच्या मते, गर्दी इतकी अनियंत्रित होती की परिस्थिती हाताबाहेर गेली होती. सुरक्षा पथकाला मोठ्या मुश्किलीने गर्दीतून वाट काढून निधीला सुरक्षित कारपर्यंत पोहोचवावे लागले.
कोण आहे निधी अग्रवाल?
निधी अग्रवालने २०१७ मध्ये टायगर श्रॉफसोबत ‘मुन्ना मायकल’ या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला. तिने ‘आयस्मार्ट शंकर’, ‘ईश्वरन’ आणि ‘हरि हारा वीरा मल्लु’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मारुती यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘द राजा साब’ हा चित्रपट ९ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या मोठ्या बजेटच्या चित्रपटात प्रभास आणि निधी अग्रवाल यांच्यासह बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजय दत्त, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.