पानीपत: हरियाणातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणात एका महिलेने केलेली कृती ऐकताच जगात किती प्रमाणात क्रुरता वाढली आहे याची जाणीव होते. आपल्या सौंदर्याबद्दलची टोकाची ईर्ष्या आणि असुरक्षितता यातून हरियाणातील एका महिलेने गेल्या दोन वर्षांत तब्बल चार निष्पाप मुलांची हत्या केली आहे. महिलेच्या या मानसिकतेने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचे दिसून येते.
हरियाणातील पानीपत शहराचे एसपी भूपेंद्र सिंग यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, आरोपी महिलेची विचारसरणी ‘Psycho killer’ प्रकारची आहे. या महिलेला सुंदर दिसणाऱ्या लहान मुलींचा तिरस्कार होता आणि भविष्यात कोणतीही मुलगी आपल्यापेक्षा अधिक सुंदर दिसू नये, या भीतीने तिने ही टोकाची भूमिका घेत चार निष्पाप मुलांचा बळी घेतला आहे. या महिलेला पोलिसांनी अटक केली असून तिचा खोल तपास सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या पूनम नावाच्या या महिलेने सुरुवातीला आपल्या नातेवाईकांमधील आणि कुटुंबातील सुंदर दिसणाऱ्या मुलींना लक्ष्य केले. २०२३ मध्ये तिने आपल्या नणंदेच्या मुलीची आणि भाच्याची हत्या केली होती. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे कोणालाही संशय येऊ नये म्हणून, तिने नंतर स्वतःच्या एका लहान मुलालाही मारून टाकले. तिच्या मनात सौंदर्याच्या व्याख्येबाबत एवढी ईर्ष्या होती की, तिने पोटच्या मुलीचा जीव घ्यायला ही विचार केला नाही.
https://prahaar.in/2025/12/04/encounter-between-soldiers-and-naxalites-in-bastar-area-of-chhattisgarh-15-naxalites-killed-3-soldiers-martyred/
पाणीपतच्या सिवाह गावामध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये पूनमने चौथ्या मुलाचा बळी घेतला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना, ६ वर्षांच्या मुलीचा पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू होणे ही गोष्ट पोलिसांना संशयास्पद वाटली. दुसरे म्हणजे, ज्या खोलीत मुलीचा मृत्यू झाला, त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता. यावरून स्पष्ट झाले की, त्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांच्या सखोल तपासात पूनमच्या हालचालींवरून तिच्यावरचा संशय दाट होत गेल्याने ती स्वत:च पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
पूनमने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की, तिची विचारसरणी अत्यंत विकृत आहे. आपण पकडले जाऊ नये किंवा आपल्यावर कोणाला संशय येऊ नये, यासाठी तिने आपल्या दोन मुलांपैकी एकाची हत्या केल्याचे तिने चौकशीमध्ये उघड केले. अशाप्रकारे गेल्या दोन वर्षांत, सोनीपतच्या भावड गावची रहिवासी असलेल्या पूनमने एकूण ४ लहान मुलांची हत्या केल्याचे समोर आल्याने समाजात एकच खळबळ उडाली आहे.