मुंबई : भारतीय सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते आणि ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे आज दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने केवळ देओल कुटुंबावरच नव्हे, तर त्यांच्या असंख्य चाहत्यांवर आणि संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. गेले काही दिवस धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना श्वसनासंबंधीचा (Respiratory illness) त्रास होत असल्याने, ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्यांना काही काळ आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना घरी उपचारासाठी नेण्यात आले होते. गेले काही दिवस ते घरीच उपचार घेत होते, मात्र त्यांची मृत्यूशी असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या निधनाची अधिकृत बातमी प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांनी जाहीर केली. करण जोहरने त्यांच्यासोबत अखेरचा ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ हा चित्रपट केला होता. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तब्बल सहा दशके प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या महान कलाकाराच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे.
https://prahaar.in/2025/11/24/actor-dharmendra-passes-away-know-dharmendra-11-most-famous-films/
८९ व्या वर्षीही अभिनयाची धमक
वयाच्या ८९ व्या वर्षीही त्यांनी अभिनयाची साथ सोडली नव्हती आणि ते सातत्याने चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. नव्वदीच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांनी चित्रपटामध्ये काम करणे थांबवले नाही. त्यांची नुकतीच करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ मध्ये केलेली भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. गेले काही दिवस त्यांची प्रकृती नाजूक होती. अखेर आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र आजारी असताना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. यात सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान, गोविंदा, आमिषा पटेल यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता. चाहत्यांमध्ये दुःख: धर्मेंद्र आजारी पडल्याची बातमी समोर आल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली होती. पण नियतीला कदाचित काही वेगळेच मंजूर होते. त्यांच्या निधनानंतर देशभरातील त्यांचे चाहते अत्यंत दुःखी झाले असून, सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा एक न भरून येणारा तोटा आहे.
‘शोले’ ते ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’पर्यंत धर्मेंद्र यांनी गाजवला सिनेसृष्टीचा पडदा
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या अभिनेत्याने तब्बल सहा दशके भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अत्यंत नम्रपणे झाली होती. धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाद्वारे सुरुवात केली. विशेष म्हणजे, या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना केवळ ५१ रुपये मानधन देण्यात आले होते. मात्र, या तुटपुंज्या मानधनामुळे ते थांबले नाहीत. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ‘शोले’, ‘धर्मवीर’, ‘मेरा गाव मेरा देश’ आणि ‘सीता गीता’ अशा विविध धाटणीच्या ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम करून सिनेसृष्टीत आपले स्थान भक्कम केले. त्यांची ‘शोले’मधील ‘विरू’ ची भूमिका आजही अजरामर आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या वयाच्या ८९ व्या वर्षापर्यंत अभिनय करणे थांबवले नव्हते. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात त्यांनी दमदार काम केले होते. या चित्रपटात त्यांनी रणवीर सिंगच्या आजोबांची (दादू) महत्त्वपूर्ण आणि भावूक भूमिका साकारली होती. धर्मेंद्र यांच्या या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीमुळे भारतीय सिनेसृष्टीला मोठे योगदान मिळाले आहे.
धर्मेंद्रचा शेवटचा चित्रपट
धर्मेंद्र यांनी अभिनित केलेला ‘इक्किस’ (Ikkis) हा सिनेमा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. दुर्दैवाने, हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. हा सिनेमा येत्या २५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. ‘इक्किस’ या चित्रपटाबद्दल धर्मेंद्र स्वतः खूप उत्सुक होते. त्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलरही शेअर केला होता. या चित्रपटात त्यांची एक महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे एका बाजूला सिनेसृष्टीतील दोन पिढ्या एकत्र आल्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र यांच्या निधनामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. पुढच्या महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने, चाहते मोठ्या पडद्यावर आपल्या लाडक्या ‘ही-मॅन’ला शेवटचा सलाम करू शकतील.