कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अर्णव खैरे (Arnav Khaire) नावाच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अर्णव हा तरुण नेमका कोणत्या महाविद्यालयात शिकत होता आणि त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आहे. अर्णव खैरे याने आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. या दुर्देवी घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः विद्यार्थी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
https://prahaar.in/2025/11/20/cm-nitish-kumar-oath-ceremony-today-only-rupees-21-thousand-in-cash-13-cows-no-house-in-his-name-at-patna-how-much-is-nitish-kumar-wealth/
नेमकं काय घडलं?
कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी अर्णव खैरे याच्या आत्महत्येमागील कारण अत्यंत धक्कादायक आणि हृदय हेलावून टाकणारे आहे. लोकल ट्रेनमधील वादातून झालेल्या मारहाणीमुळे मानसिक तणावाखाली येऊन अर्णवने टोकाचे पाऊल उचलल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्णव खैरे हा मुलुंड येथे कॉलेजला जात असताना ट्रेनमध्ये धक्का लागला. यातून हिंदी-मराठी बोलण्यावरून काही तरुणांशी त्याचा जोरदार वाद झाला. या वादामुळे चिडलेल्या चार ते पाच जणांनी अर्णवला बेदम मारहाण केली. लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या मारहाणीमुळे मानसिक तणावात असलेल्या अर्णव खैरे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्देवी घटनेमुळे मराठी तरुणांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. रेल्वेतील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे अर्णवला मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करून कठोर शिक्षा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.