नोंदणी केली सुमारे २४ हजार, अनामत रक्कम भरली केवळ ८८५ अर्जदारांनी
मुंबई(खास प्रतिनिधी): सर्वसामान्य माणसांना मुंबईत घर घेणे शक्य व्हावे म्हणून महापालिकेच्यावतीने ४२६ घरांसाठी काढलेल्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून आतापर्यंत २३ हजार ७०४ अर्जदारांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. मात्र,यापैंकी ११ हजार अनामत केवळ ८८५ अर्जदारांनी भरलेली आहे. मात्र, भायखळा आणि कांदिवलीतील घरांना अल्प प्रतिसाद लाभताना दिसत आहे. या घरांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर २०२५ असून आता फक्त शेवटचे चार दिवस उरले आहेत.
मुंबईचा विकास आराखडा तयार करून परवडणारी घरे बांधण्याचा संकल्प केल्यानंतर आता ही प्रत्यक्षात याचा लाभ मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्यावतीने ४२६ घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु झाली आहे. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जांच्या नोंदीनुसार, आतापर्यंत २३,७०४ अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी केलीआहे. मात्र,ही नोंदणी केल्यानंतर त्यासोबत नोंदणी शुल्क भरल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते. त्यासाठी ११८० रुपये नोंदणी शुल्क आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या अर्जदारांपैंकी केवळ ७७२ अर्जदारांनीच नोंदणी शुल्क भरले आहे. तर घरांच्या किंमतीनुसार अर्जासोबत अनामत ११ हजार रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक असते. अशाप्रकारे केवळ २२९ अर्जदारांनीच अर्जासोबत अनामत भरलेली आहे. कांजूरमार्ग, विक्रोळी,भायखळा तसेच भांडुप आदी भागांमध्ये या सदनिका असून या सदनिकांची रक्कम कमीत कमी ५४ लाख ते जास्तीत जास्त १ कोटी १० लाखांपर्यंत आहे.
अंधेरी मरोळ, जोगेश्वरी मजास गाव, कांदिवली पश्चिम, भांडुप पश्चिम, गोरेगाव पूर्व पिरामल नगर आदी भागांमधील सदनिकांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद लाभलेला असून यासर्व भागांतील सदनिकांसाठी सरासरी एक हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२५ असून पुढील चार दिवसांमध्ये अनामत रक्कम भरणाऱ्या अर्जदारांची संख्या वाढेल असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.