Home देश किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या सर्वांना आरक्षण दिले. पण लष्करात जाती-पातीच्या आधारावर आरक्षण? मला वाटते की, याची चर्चा देखील झाली नाही पाहिजे. आपल्या सैन्याच्या जवानांचा एकच धर्म असतो आणि तो म्हणजे ‘सैन्य धर्म’, त्याव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म नसतो. राहुल गांधी हे संरक्षण दलांमध्ये आरक्षणाची मागणी करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काँग्रेसला सांगू इच्छितो की किमान आपल्या लष्कराला राजकारणात ओढू नका, असे सांगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.

उद्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यादरम्यान प्रचार सभेत बोलताना सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर लष्कराला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आणि लष्करात विविध समाजांसाठी आरक्षणाची मागणी केल्याबद्दल त्यांच्यावर टीका देखील केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लष्करावर केवळ १० टक्के लोकांचे नियंत्रण असल्याचे वक्तव्य केले आहे , यावरून देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी त्यांच्यावर टीका केली. संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर भारतीय लष्कराला विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचा आऱोप केला. यावेळी त्यांनी , “सैन्याला कोणताही धर्म किंवा जात नसते,” असेही स्पष्ट केले आहे.