Home क्रीडा भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत हे जेतेपद पटकावले. या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सत्कार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी भारतीय महिला संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं आणि संघाचं अभिनंदन करणारा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

तसेच, संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना राज्य सरकारतर्फे रोख पारितोषिक देण्याचेही ठरवले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली. भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्राच्या तीन खेळाडू आहेत. यात महाराष्ट्रातील सांगलीची कन्या भारताची उपकर्णधार स्मृती मानधना आहे. तिच्याशिवाय भारताच्या सेमीफायनल विजयाची शिल्पकार जेमिमा रॉड्रीग्ज व फिरकीपटू राधा यादव आहेत. या तिन्ही खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात येणार रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. याशिवाय संपूर्ण भारतीय संघाचा सत्कार करण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.