Home महत्वाची बातमी Maharashtra Rain: राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Maharashtra Rain: राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

0
Maharashtra Rain: राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई (वार्ताहर) : राज्यातील काही भागात मागील दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. काही भागात शनिवारी पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मावेळी काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. दरम्यान, उत्तर अंदमान समुद्रात म्यानमारच्या किनाऱ्यालगत सोमवारपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे २५ सप्टेंबरपर्यंत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण उत्तर प्रदेशापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

राज्यात सर्वत्र रविवारपासून पावसाची शक्यता आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील. मुंबईतही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, मुंबईत मागील काही दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे उकाडा सहन करावा लागत आहे. तापमानातही काहीशी वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३०.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे २१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील तापमान १ अंशाने अधिक नोंदले गेले. रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडणार आहे.