वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया अंतर १५ मिनिटांत पार करता येणार
मुंबई : देशातील पहिल्या भुयारी मेट्रो रेल्वेचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर मुंबईत आणखी एका भूमिगत मेट्रो प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया अशा १६ किमी मार्गावर हा प्रकल्प उभारला जाणार असून, त्यासाठी तब्बल २४ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही मेट्रो मार्गिका वेळेत पूर्ण झाल्यास वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करता येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत ‘मुंबई मेट्रो मार्गिका – ११’ प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया अशा १६ किलोमीटर लांबीची पूर्ण भुयारी मार्गिका असेल.
https://prahaar.in/2025/08/20/police-recruitment-gr-has-arrived-mega-recruitment-for-15631-posts-in-maharashtra/
कुलाब्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौक आणि हॉर्निमन सर्कल अशा महत्त्वाच्या ठिकाणांवरून ही मेट्रो धावेल. जवळपास २४ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, जपानच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेकडून (जायका) यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या मार्गिकेमुळे मुंबईकरांना वाहतुकीत मोठा दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जुन्या लोकल टप्प्याटप्प्यानं हटवल्या जाणार
मुंब्रा येथील रेल्वे अपघातानंतर मुंबईतील सर्व लोकल एसी करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानुसार या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या (एमयूटीपी) टप्पा ३ आणि ३ए अंतर्गत नवीन गाड्यांची खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.
https://prahaar.in/2025/08/20/dear-sisters-in-government-jobs-in-crisis/
पहिल्या टप्प्यात तब्बल २६८ एसी गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. या गाड्या मेट्रोप्रमाणेच बंद दरवाज्याच्या असतील. जुन्या, दरवाजा नसलेल्या लोकल रेल्वे टप्प्याटप्प्याने हटवल्या जातील. त्याजागी आधुनिक गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. विशेष म्हणजे तिकीट दरांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर ट्रेनची खरेदी सुरू होणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.