Home साप्ताहिक रिलॅक्स श्रीमंत भिकाऱ्याची गोष्ट

श्रीमंत भिकाऱ्याची गोष्ट

श्रीमंत भिकाऱ्याची गोष्ट

मनभावन : आसावरी जोशी

आज थोड्या वेगळ्या विषयावर बोलावेसे वाटले… बऱ्याच जणांना असे वाटेल की मी हा विषय का निवडला…? विषय आहे भीक मागणे… कसेसेच वाटते ना वाचून. सोज्वळ… सात्त्विक सदरात अचानक हे काय… ? यात मनभावन असे काय…? मनास भावणारा नसला तरी विषय मनास नक्कीच टोचणी देणारा आहे.

दोन दिवसांपूर्वी बातमी वाचली. आपल्या मुंबईत साडेसात कोटींचा मालक असलेला भिकारी राहतो. भीक मागून त्याने ही संपत्ती कमावली आहे. भारत जैन असे त्याचे नाव आहे. लहानपणाच्या हलाखीच्या परिस्थितीतून त्याने भीक मागण्याचा निर्णय घेतला. यातून त्याने मुंबई- पुण्यात घरे, दुकाने थाटली आहेत. या दोन्ही दुकानांतून त्याला प्रत्येकी ७०,००० भाडे मिळते. सव्वा कोटींच्या घरात तो राहतो. त्याची दोन्ही मुले कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आझाद मैदान या परिसरात त्याचा हा भिकेचा व्यवसाय चालतो. आता त्याच्या घरचे त्याला भीक मागण्यापासून परावृत्त करतात. पण त्याने यातच जम बसविल्याने, तो भीक मागणे कधीच सोडणार नाही असे सांगतो.

विचार करण्यास भाग पडणारी ही घटना किंवा हा माणूस आहे. भीक मागणे… म्हणजे आपल्याकडे अजूनही नाकर्तेपणाचे लक्षणच समजले जाते. ज्याला काहीच जमत नाही तो भीक मागतो. भीक अर्थात भिक्षा, जोगवा असे अनेक कंगोरे या कृतीला आणि शब्दाला आहेत. भीक मागणे या कृतीला भिक्षा, जोगवा या दोन शब्दांची जोड मिळते तेव्हा सारा रोखच बदलतो. साधू-संन्यासी पोटापुरती भिक्षा मागून त्या अन्नधान्यावर भूक भागवितात. देवीआईच्या नावाने जोगवा मागितला जातो. त्यातून मिळालेल्या धान्यावर त्यांची चूल पेटते. जोगवा या शब्दाचे अर्थ तर फार वेगळे आणि मनास भिडणारे होतात. यावर नक्कीच वेगळेपणाने स्वतंत्र लिहीन. पण ही आजची ताजी घटना मनास अस्वस्थ करून जाते. आपल्यापैकी प्रत्येक प्रामाणिक माणसाला पोटाची खळगी भरण्यासाठी लहानपणापासून प्रचंड मेहनत करावी लागते. शालेय शिक्षणापासून त्याची सुरुवात होते. आपल्यापैकी अनेकजण मनात वेगळी… सुंदर स्वप्ने असूनही भवितव्य सुरक्षित करण्यासाठी स्वत:च्या नावडीची वाट निवडतात. जिद्दीने त्या वाटेवर चालणे पूर्ण करून पुन्हा नोकरी- व्यवसायाच्या काट्यावर स्वत:ला बांधून घेतात. मेहनतीने आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करतात, घरकुल उभारतात… आपल्या पिलांनाही हेच बाळकडू पाजतात. प्रामाणिक जगणे शिकवितात. ज्यात पावलोपावली संघर्ष असतो. जगण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची लढाई असते. पण जेव्हा भीक मागण्यासारख्या लाजिरवाण्या कृतीतून कोट्यवधी रुपये कमावले जातात. तेव्हा मन विचार करू लागते. आपण केलेल्या कष्टांतून आपण साधे छोटेसे घरही मुंबईत घेऊ शकत नाही आणि समजा घेतले तरी ते घेण्यात अख्खी हयात जाते. मग आपण करत असलेल्या प्रामाणिक कष्टांचा… मेहनतीचा उपयोग काय…?

येथे थोडे शासकीय धोरण पाहू… आपल्या महाराष्ट्रात सर्वप्रथम भिक्षा प्रतिबंधक कायदा लागू झाला आहे. या अंतर्गत भीक मागणारा गुन्हेगार ठरतोच, पण भीक देणाराही तितकाच गुन्हेगार ठरतो. महाराष्ट्रात भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी १४ भिक्षेकरीगृह उभारली आहेत. त्यात साताऱ्यात एका भिक्षेकरीगृहात चार क्षयरोगी राहतात आणि भिकारी सगळे उजळ माथ्याने मुंबईत कोट्यधीश होतात.
येथे मला एक शेरलॉक होम्सची गोष्ट आठवते.

इंग्लंडच्या रस्त्यावर एक भिकारी असाच भीक मागून अत्यंत श्रीमंत होतो. लग्न करतो. आलिशान महालात संसार थाटतो. मुले उत्तम शिक्षण घेतात. पण तो आपला हा व्यवसाय घरातल्यांपासून नेहमीच लपवून ठेवतो. पत्नीलाही त्याच्या या व्यवसायाविषयी काहीच माहीत नसते. आपल्या या श्रीमंतीचा स्त्रोत कुठून येतो हे जाणून घेण्यासाठी, आणि मुख्य म्हणजे आपला नवरा काय काम करतो हे जाणून घेण्यासाठी ती शेरलॉक होम्सची मदत घेते. अर्थातच आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर होम्स या भिकाऱ्याला त्याच्या बायकोसमोर आणतोच. त्या भिकाऱ्याला प्रश्न विचारला जातो,की हा त्याचा उद्योग त्याने लपवून का ठेवला? त्यावर तो सांगतो, मला नेहमीच माझ्या या व्यवसायाची लाज वाटत आली आहे. त्यातूनच मला भीती वाटली की माझी पत्नी मला सोडून निघून जाईल. ्हणून मी माझे हे काम सर्वांपासून लपवून ठेवले आहे. पण आजच्या मुंबईतील आधुनिक भिकाऱ्याला मात्र आपल्या या कामाचा अभिमान वाटतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का…?