मुंबई : मुंबईमधील पश्चिम उपनगरात आज सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी ते वांद्रे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत असून, वाहतूक कोंडीने मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे. अंधेरीच्या सबवेमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे म्हणून तो बंद करण्यात आला आहे, त्यामुळे सखल भागातील रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
लांबच लांब रांगा
मुंबईच्या वाहतुकीचा महत्वाचा कणा मानला जातो तो म्हणजे पश्चिम द्रुतगती महामार्ग, तो आज सकाळपासूनच ठप्प झाला आहे. जोगेश्वरी, अंधेरी आणि वांद्रे या मार्गावर गाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांची गती मंदावली आहे, तर काही ठिकाणी वाहने पूर्णपणे थांबली आहेत. प्रवाशांना तासंतास वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ आली आहे. “सकाळी ऑफिसला जाण्यासाठी निघालो, पण २ तासांपासून एकाच जागी अडकलो आहे,” अशी खंत अंधेरी येथील एका वाहनचालकाने व्यक्त केली.
https://prahaar.in/2025/07/25/heavy-rains-wreak-havoc-in-mumbai-once-again-juhu-andheri-waterlogged-western-railway-traffic-disrupted/
मुंबई पोलिसांचं आवाहन
मुंबईकरांना अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडा तसेच किनारपट्टीच्या भागापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे, त्याचबरोबर सांभाळून गाडी चालवण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. आपत्कालीन स्थितीत १००, ११२ आणि १०३ वर संपर्क करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.