Home ब्रेकिंग न्यूज ‘गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करू’

‘गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करू’

0
‘गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करू’

शहरी नक्षलवाद्यांचा डाव हाणून पाडू

पेण : गणेशोत्सव, दहीहंडी, नागपंचमी अशा हिंदू सणांच्या विरोधात षडयंत्र रचले जाते. हा शहरी नक्षलवाद्यांचा डाव आहे. आपण तो हाणून पाडू आणि यावेळी राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करु असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केले. गणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण येथील हमरापूर, जोहे, कळवे या गावातील मूर्तीकारांच्या विविध संघटनातर्फे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचा तांबडशेत येथे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, पीओपीच्या मूर्तीवरील बंदीबाबत ठरवून षडयंत्र केले गेले. तत्कालीन काँग्रेस आणि आताची महाविकास आघाडी हे सगळेच त्यात सामील होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि आम्ही मूर्तीकार बांधवांच्या सोबतीने एकजुटीने लढलो आणि जिंकलो देखील. हा विजय आपल्या पारंपारिक सणांच्या जपणुकीसाठी खूप महत्त्वाचा होता.

गेली काही वर्षे हिंदुत्वाचा प्रतीक असलेला सार्वजनिक गणेशोत्सवाचा सण हा बंद करण्याचा जणू घाटच घातला आहे. या षडयंत्रात काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उबाठा सेना सहभागी असून हा शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा आहे. याची सुरूवात २००३ साली झाली जेव्हा नैसर्गिक जलस्त्रोतावर होणारे हिंदूंचे अत्यंविधी आणि अन्य संस्कार विधी बंद करावे अशी मागणी करीत एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. .या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करताना तत्कालीन आघाडी सरकारने पीओपीच्या गणेशमूर्तीचा विषय यामध्ये घुसवला. त्याचवेळी जर तत्कालीन सरकाने या याचिकेला विरोध केला असता तर एवढा मोठा लढा देण्याची वेळ आली नसती, असे सांगत भाजपाने दिलेल्या न्यायालयासह विविध पातळीवरील लढ्याची संपूर्ण माहिती या भाषणात शेलार यांनी दिली. तसेच यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा करुया असे सांगत आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील ही यावेळी त्यांनी जाहीर केली.