लंडन: इंग्लंडमध्ये ऐतिहासिक टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ आता पाचव्या आणि शेवटच्या सामन्यातही आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ३-१ अशी विजयी आघाडी घेतलेली भारतीय टीम, आता ४-१ अशा मोठ्या फरकाने मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.
मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीत दमदार कामगिरी केली होती. चौथ्या सामन्यात तर त्यांच्या क्षेत्ररक्षणातही लक्षणीय सुधारणा दिसली, ज्यामुळे त्यांना इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच मालिका जिंकण्यात यश मिळाले.
https://prahaar.in/2025/07/12/saturday-stock-market-outlook-exclusive-last-week-was-trump-hit-what-will-the-vix-of-last-weeks-7-34-percent-determine-next-weeks-direction-why-will-nifty-hit-a-high-read-market-outlook-analys/
गोलंदाजीत दीप्ती, फलंदाजीत मानधनाचा जलवा!
भारतीय फिरकी आक्रमणाने इंग्लंडच्या फलंदाजांना पूर्णपणे गोंधळात पाडले आहे, विशेषतः महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी प्रभावी ठरली आहे. फलंदाजीमध्ये स्मृती मानधनाने सर्वाधिक धावा केल्या असून, तिने शेफाली वर्मासह संघाला प्रत्येक सामन्यात आक्रमक सुरुवात करून दिली आहे. मधल्या फळीत जेमिमा रॉड्रिग्ज सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरला मात्र अजूनही मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे, एकदिवसीय मालिकेपूर्वी शेवटच्या टी-२० सामन्यात आपला फॉर्म परत मिळवण्यावर ती निश्चितपणे लक्ष केंद्रित करेल. आता भारतीय संघ ही मालिका मोठ्या फरकाने जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.