Home ब्रेकिंग न्यूज मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम राहणार असल्याचे चित्र आहे. वडखळ-पेण मार्गावरील उड्डाणपुलांवर पाणी साचण्याबरोबरच त्यांना तडे गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

गेल्या अठरा वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला आणि उड्डाणपुलांना तडे गेले आहेत. पोलादपूरजवळील चांढवे, महाडजवळील नांगलवाडी, विसावा हॉटेल, नातेखिंड, वहूर, वीर रेल्वे स्टेशन, लोणारे खांब, पेण आदी ठिकाणच्या उड्डाणपुलांवर सध्या मोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, वडखळ येथून अलिबागकडे येणाऱ्या सेवारस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत.

पेणपासून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलांवर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने आणि सदोष आखणीमुळे थोड्या पावसातही पाणी साचते. यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही आणि खड्डे चुकवताना रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही महामार्गाची ही दुरवस्था कायम असल्याने, या खर्चावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.