Home महाराष्ट्र पालघर अकरावी प्रवेशासाठी ऑफलाइन प्रणालीची मागणी

अकरावी प्रवेशासाठी ऑफलाइन प्रणालीची मागणी

अकरावी प्रवेशासाठी ऑफलाइन प्रणालीची मागणी

वाडा : पालघर जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी इंटरनेट अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शिक्षण संचालनालयामार्फत अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आलेली असली, तरी जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये अद्यापही सुसज्ज इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता, खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी माननीय मुख्यमंत्री व माननीय शिक्षणमंत्री यांना याबाबत ईमेलद्वारे पत्र व्यवहार करत सविस्तर मागणी केली आहे.

दुर्गम व आर्थिकदृष्ट्या मागास भागांतील अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोनची सुविधा नसल्यामुळे ते ऑनलाइन फॉर्म भरू शकत नाहीत. परिणामी, त्यांची अकरावी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता असून, त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष धोक्यात येऊ शकते. या पार्श्वभूमीवर, पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी खासदार डॉ. सवरा यांनी केली आहे. ऑफलाइन प्रणालीच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सुलभ होईल आणि त्यांचे शिक्षण खंडित होणार नाही.