मुंबई : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सुधारित वक्फ विधेयक सादर केले. सध्या लोकसभा सभागृहात या विधेयकावर चर्चा सुरू असून, सत्ताधारी याचे समर्थन करत आहेत. तर, विरोधक याला विरोध करत आहेत. याचबरोबर या वक्फ दुरूस्ती विधेयकावरून सभागृहाबाहेरही प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्फ विधेयकावरील भूमिकेवरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
https://prahaar.in/2025/04/02/discussion-on-waqf-bill-begins-in-lok-sabha-government-mentions-five-important-points/
काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
वक्फ दुरूस्ती विधेयकावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “हे विधेयक मुस्लिम समाजाच्या फायद्याचे आहे. त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे.” पुढे पत्रकारांनी या विधेयकावरील ठाकरे गटाच्या भूमिकेचा उल्लेख करतात एकनाथ शिंदे म्हणाले, “हे बघा, असली पळपूटी भूमिका कशाला घ्यायची. स्पष्ट भूमिका घ्या ना. तुम्ही गोष्टी जेव्हा फायद्याच्या असतात तेव्हा धरता आणि तोट्याच्या असतील तेव्हा सोडतात. विधानसभा निवडणुकीत ते १०० जागा लढले आणि २० जिंकले.
इथून पुढे होणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता बघायचे आहे की, ते बाळासाहेबांचे विचार आणि भूमिका घेऊन पुढे जातात की, राहुल गांधी सांगतील तसे करणार.” दरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.