मुंबई : महाराष्ट्रात ई कॅबिनेट अस्तित्वात येणार आहे. राज्यात गतीमान आणि पारदर्शक कारभार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ई कॅबिनेट ही व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. या व्यवस्थेद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल. याबाबतचे सादरीकरण मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले.
https://prahaar.in/2025/01/07/chief-minister-fadnaviss-seven-point-action-program-for-officials-to-make-life-easier-for-common-people/
राज्य शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला असून त्याचाच एक भाग म्हणून ई कॅबिनेटचा निर्णय घेतला आहे. ‘ई-कॅबिनेट’ हा राज्य शासनाचा पर्यावरणपूरक उपक्रम आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी कागदांचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर कमी करण्यासाठी हे संपूर्ण आयसीटी (ICT) सोल्यूशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या हरित उपक्रमांतर्गत स्मार्ट टॅब्लेट्सद्वारे कागदविरहीत मंत्रिमंडळ बैठक सहज पार पडू शकेल. या प्रणालीमुळे मंत्र्यांसाठी अत्यंत सुलभ डॅशबोर्ड उपलब्ध होईल. त्याचबरोबर आवश्यक संदर्भ शोधणे, कृती बिंदू (ॲक्शन पॉइंट) पाहणे आणि घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत पुनरावलोकन करणे सोपे होईल. ई-कॅबिनेटमुळे मंत्रिमंडळ बैठकांचे, निर्णयांचे व त्यासंबंधीच्या दस्तऐवजांचे जतन होईल. मंत्रिमंडळ निर्णय आणि त्यासंबंधीचे संदर्भ शोधणे सहज शक्य होईल. ही प्रणाली पूर्णपणे डीजिटल स्वरूपात असून याद्वारे प्रत्येक टप्पा सहज पार पाडला जाईल. आतापर्यंत होत आलेल्या पारंपरिक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर या प्रणालीमुळे मात करता येईल. मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणारा प्रस्ताव ऑनलाईन अपलोड करणे, तो मंत्रिमंडळासमोर चर्चेसाठी आणि निर्णयासाठी सादर करणे, त्यावर अंतिम निर्णय व त्याबाबतच्या सर्व नोंदी ठेवणे, ही सर्व प्रक्रिया सहजरित्या पार पडणार आहेत. हा सुशासनाच्या पूर्ततेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रणालीमुळे कागदांचा वापर कमी होण्यासोबतच मंत्रिमंडळाचा आणि या प्रक्रियेतील अधिकारी – कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे.