अलिबाग : समुद्रातील वाढते प्रदूषण, कंपन्यांमार्फत होणारा भराव, बदलते हवामान अशा अनेक कारणांमुळे पारंपरिक मीठ व्यवसाय कालबाह्य होण्याच्या मार्गावर होता. मात्र, पेण तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेत या व्यवसायाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. शिर्की, वाशी, वडखळ परिसरात तीनशे एकर क्षेत्रामध्ये आता मिठागरे उभी राहिली असून, यातून अनेकांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे. त्यामुळे हा व्यवसाय आता पुन्हा उभारी घेण्याच्या मार्गावर आहे.
रायगड जिल्ह्यात फार पूर्वीपासून मिठागरे पाहायला मिळायची. अलिबाग, पेण, उरण, पनवेल या तालुक्यांमध्ये मीठ तयार करण्याचा व्यवसाय चालत असे. कालौघात वाढते औद्योगिकीकरण, वाढते नागरिकरण आणि प्रदूषणामुळे ही मिठागरे हळूहळू नाहीशी झाली. इतकेच नव्हे, तर नवनवीन उद्योग आल्यामुळे नवीन पिढीही या व्यवसायापासून दूर गेली. पेण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा मीठ तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे.
https://prahaar.in/2025/01/03/drinking-this-water-will-not-make-you-feel-hungry-frequently-your-digestion-will-remain-smooth/
पेण तालुक्यातील वाशी, वडखळ, शिर्की अशा अनेक भागातील शेतकरी हा व्यवसाय करत होते. पूर्वी तालुक्यात सुमारे २, २०० एकर क्षेत्र मिठागरांनी व्यापले होते. त्यातून मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन घेतले जायचे. आता वाशी, शिर्की, चिखली, वडखळ या परिसरात सुमारे ३५० एकर क्षेत्रामध्ये मिठागरे तयार करण्यात आली आहेत. या व्यवसायातून लाखोंचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. हे मीठ वीटभट्टी, आंबा कलम, बर्फ कारखाना, तसेच खाण्यासाठी देखील वापरले जात आहे. तीन ते चार रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री होत आहे. या भागात तयार होणारे मीठ रायगड जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विक्रीसाठी पाठविले जात असून, काही मीठ विक्रेते बैलगाडीने गावोगावी जाऊन या मिठाची विक्री करीत असतात. पेण शहरात मिठाचे मोठे घाऊक व्यापारी होते. त्यांच्याकडून राज्याच्या अनेक भागांत मिठाचा पुरवठा होत असे; परंतु मिठागरे संपुष्टात आल्यानंतर हा घाऊक व्यापारही बंद झाल्याचे चित्र आहे.