Home ताज्या घडामोडी समीर वानखेडेंच्या नव्या राजकीय इनिंगला तुर्तास ब्रेक

समीर वानखेडेंच्या नव्या राजकीय इनिंगला तुर्तास ब्रेक

समीर वानखेडेंच्या नव्या राजकीय इनिंगला तुर्तास ब्रेक

प्रवेशाबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याची गोगावलेंची माहिती

मुंबई : महाराष्ट्राचे चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा चर्चा होत्या. एवढेच नव्हे तर, ते धारावीतून विधानसभेच्या रिंगणात उतरणार होते. मात्र, वानखेडे यांच्या राजकीय इनिंगला तुर्तास ब्रेक लागला असून, असा कोणताही प्रस्ताव नसून,वानखेडे शिवसेनेतून लढणार नसल्याचे स्पष्टीकरण शिंदेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आले. त्यामुळे गुरूवारी दिवसभर सुरू असलेल्या चर्चांना तुर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे.

४४ वर्षीय समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे आयआरएस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अधिकारी आहेत. २०२१पर्यंत त्यांनी मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर म्हणून काम केले आहे. एनसीबीमध्ये रुजू होण्यापूर्वी वानखेडे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये काम केले आहे. १५ वर्षांच्या कारकिर्दीत १७ हजार किलो अंमली पदार्थ आणि १६५किलो सोने जप्त करण्याची कारवाई वानखेडे यांच्या कार्यकाळात झाली आहे. याशिवाय अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातही समीर वानखेडे चर्चेचा विषय बनले होते.

दरम्यान, समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी माध्यमाशी बोलताना निवडणुक लढविण्यास इच्छुक या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांचा शिवसेना शिंदे गटात लवकरच प्रवेश होणार असल्याच्या वृत्तावर यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र,शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी याबाबत उघडपणे माहिती देण्याचे टाळले. समीर वानखेडे यांच्या पक्षप्रवेश आणि उमेदवारीबाबत आपल्याला वस्तुस्थिती माहित नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वस्तुस्थिती पाहून निर्णय घेतील, असे एका वाक्यात गोगावले यांनी उत्तर दिले आहे.

राज्यात इच्छुक उमेदवारांची मोठी तयारी सुरु झाली आहे. यामध्ये चर्चित समीर वानखेडे यांचंही नाव समोर आले आहे. समीर वानखेडे महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात यासंदर्भात मोठी निर्णय होईल आणि लवकरच त्यांची उमेदवारी जाहीर होईल, असं क्रांती रेडकर हिने सांगितलं आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा समीर वानखेडे माध्यमांमध्ये चर्चेत आले आहेत. तसेच, ते त्यांचे मूळ गाव असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार की मुंबईतून याचीही चर्चा होत आहे.