Home ताज्या घडामोडी सांगलीत विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू!

सांगलीत विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू!

0
सांगलीत विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू!

सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश असून, गावात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये पारसनाथ वनमोरे (४०), त्यांचा मुलगा शाहीराज (१२), आणि प्रदीप वनमोरे (३५) यांचा समावेश आहे. आणखी एक जण, हेमंत वनमोरे (२५), या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज सकाळी शेतात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या पारसनाथ वनमोरे यांना शेतात तुटलेली वीजवाहक तार पडल्यामुळे शॉक लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. वडिलांना शोधण्यासाठी गेलेला मुलगा शाहीराजही त्या तारेच्या संपर्कात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, प्रदीप वनमोरे घटनास्थळी जात असताना त्यांना देखील विजेचा धक्का बसला आणि त्यांचाही मृत्यू झाला.

ही दुर्दैवी घटना संपूर्ण म्हैसाळ गावासाठी धक्कादायक ठरली असून ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.