Home क्राईम MP Crime : भाजपा नेत्याची भर चौकात गोळ्या झाडून हत्या!

MP Crime : भाजपा नेत्याची भर चौकात गोळ्या झाडून हत्या!

MP Crime : भाजपा नेत्याची भर चौकात गोळ्या झाडून हत्या!

हल्लेखोर फरार झाल्याने उडाली खळबळ

इंदौर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली असून ही चिंताजनक बाब आहे. त्यातच मध्यप्रदेशच्या इंदोरमधून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भाजपा युवा मोर्च्याच्या नेत्याची चक्क भर चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर हल्लेखोर फरार झाले असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे (Monu Kalyane) यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोनू मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जात आहे. मध्य प्रदेशातील एमजी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमणबाग परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून पियुष आणि अर्जुनने मोनू कल्याणेवर गोळ्या झाडल्या. सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनू कल्याणे शनिवारी रात्रीपासून भगवा यात्रेच्या तयारीत होते. दरम्यान, पियुष आणि अर्जुन नावाचे दोन युवक दुचाकीवरून चिमणबाग चौकात पोहोचले. दुचाकीवरच बसून दोघेही मोनू कल्याणे यांच्याशी काहीतरी चर्चा करत होते. दरम्यान, दुचाकीवर मागे बसलेल्या अर्जुननं पिस्तुल काढून मोनू कल्याणे यांच्यावर गोळीबार केला आणि पियुषसह घटनास्थळावरून पळ काढला. चिमणाबाग चौकाचौकात उपस्थित असलेल्या मोनूच्या मित्रांवरही आरोपींनी गोळीबार केला, मात्र ते बचावले. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी मोनू यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे चिरंजीव आणि माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या निकटवर्तीयांमध्ये मोनू कल्याणे यांची वर्णी लागायची. हत्येनंतर आकाश विजयवर्गीय यांनी त्यांच्या समर्थकांसह मोनूच्या घरी पोहोचून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.

काय म्हणाले कैलाश विजयवर्गीय?

मध्य प्रदेशातील मंत्री कैलाश विजयवर्गीय प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “ही अत्यंत दुःखद घटना आहे. मारेकऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मी प्रशासनाला केली आहे. मोनू कल्याणे आमचा खूप चांगला कार्यकर्ता होता, तसेच ते पक्षाचे पदाधिकारीही होते. ज्यांनी मोनू यांचा खून केला, ते बहुधा त्यांचे शेजारी असल्याची माहिती मला मिळाली आहे. त्याच्या कौटुंबिक वादाबाबत मला माहिती नाही.”. पुढे बोलताना इंदूरची कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित असल्याचं वर्णन करताना विजयवर्गीय म्हणाले, ‘येथील कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. दहा-वीस खून झाले आहेत असं नाही. आता शेजाऱ्यानंच खून केला असेल तर याप्रकरणी पोलीस प्रशासन काय करू शकतं? पण याचा अर्थ शहरात टोळीयुद्ध सुरू आहे, असं होत नाही.