Home महाराष्ट्र मान्सूनपूर्व पावसाने तळा तालुक्यात पुन्हा विजेचा लपंडाव

मान्सूनपूर्व पावसाने तळा तालुक्यात पुन्हा विजेचा लपंडाव

मान्सूनपूर्व पावसाने तळा तालुक्यात पुन्हा विजेचा लपंडाव

विजेचा पाच तासांचा ब्रेक; विजेअभावी नागरिकांची होते गैरसोय

तळा : पावसाळा सुरू होताच, तळा तालुक्यातील बत्तीगुल होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. दरवर्षी पावसाच्या आगमनापासूनच तळा तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू होतो आणि एकदा गेलेली वीज जवळजवळ ४ ते ५ तास येत नाही. यामुळे विजेअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होते.

पावसाळा सुरू व्हायच्या आधी महावितरण विभागाने झाडे तोडणे, बॉक्स मेंटेनन्स, ब्रेकर मेंटेनन्स, जिओडी मेंटेनन्स, जीर्ण खांब बदलणे यांसारखी पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे वेळीच पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र पावसाळा तोंडावर आला असताना देखील महावितरण विभागाची ही कामे पूर्ण झाली नव्हती. परिणामी जराजरी ढगांचा गडगडाट अथवा रिमझिम पावसाला सुरुवात होताच, महावितरण विभागाकडून तळा तालुक्याची बत्तीगुल करण्यात येते. यामुळे पावसाळ्यात जरी नागरिकांना थंडावा जाणवत असला, तरी लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना रात्रभर मच्छरांचा सामना करावा लागतो.

काही वेळा मुसळधार पावसामुळे संपूर्ण दिवसभर देखील तालुक्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो व याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, वीजबिल वसुलीसाठी महावितरण जेवढ्या तत्परतेने मेहनत घेते, ती मेहनत पावसाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी का घेत नाही, असा प्रश्न देखील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

पावसाला अद्याप सुरुवात झाली आहे. मात्र तळा गावात सतत ४ ते ५ तास वीज जात असल्याने, ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गावातील सगळीच कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे मातीची रास रस्त्यावर साचली आहे. वाहनांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात गावातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीजबील वसुली केली जाते. मात्र तेवढ्या तत्परतेने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये बरीच नाराजी व्यक्त होत आहे.