Home ताज्या घडामोडी मिरजेतील भूपाल माळी आत्महत्या प्रकरणात गृहमंत्र्यांनी घेतली दखल

मिरजेतील भूपाल माळी आत्महत्या प्रकरणात गृहमंत्र्यांनी घेतली दखल

मिरजेतील भूपाल माळी आत्महत्या प्रकरणात गृहमंत्र्यांनी घेतली दखल

लवकरच सरकारी वकिलांची होणार नियुक्ती

सांगली : मिरजेतील भूपाल माळी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. घटना घडून सात वर्ष झाली तरी भूपाल माळी यांच्या कुटुंबाला अद्याप न्याय मिळालेला नाही. सदर घटना सात वर्षापूर्वी घडली असून या घटनेतील कारवाई लवकरात लवकर व्हावी आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी माळी कुटुंबाची कोर्टात भक्कम बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी पत्नी शोभा माळी यांनी शासनाकडे केली होती. या संदर्भात गृहमंत्र्यांनी दखल घेतली असून काही लोकप्रतिनिधींनी याबाबत मंत्रालयात पाठपुरावा देखील सुरू केला आहे आणि लवकरच सदर घटनेत ॲड संजीव देशपांडे यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

संपूर्ण प्रकरण असे आहे की, मिरजेतील वैरण बाजार परिसरातील घरकुलाच्या वादातून जमादार बंधूंनी माळी कुटुंबाला घराबाहर काढले. त्यानंतर माळी यांनी याबाबत पोलिसांसह प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी देखील दिल्या. मात्र काही अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे तक्रार घेण्यात आली नाही. त्यानंतर माळी यांनी दि. २३ जून २०१६ रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वीं त्यांनी चिट्ठी लिहून ठेवली होती. या चिट्ठीतील मजकुरावरून मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊनही या प्रकरणात अटकेची कारवाई झाली नाही.

सध्या मुंबईं उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. माळी कुटुंबाला न्याय देण्यासाठी आणि पतीच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईं व्हावी यासाठी उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील ॲड संजीव देशपांडे यांची नियुक्ती होणार आहे आणि याबाबत शासनास पत्रव्यवहार देखील झाला आहे. त्यामुळे लवकरच माळी कुटुंबाला न्याय मिळेल, अशी सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.