Home संपादकीय विशेष लेख भारतीय नौदलाचे नवोन्मेषामधील योगदान

भारतीय नौदलाचे नवोन्मेषामधील योगदान

भारतीय नौदलाचे नवोन्मेषामधील योगदान

कमांडर राहुल वर्मा (निवृत्त)

भविष्याचा अंदाज बांधणे केवळ अशक्य आहे. आपण सध्याच्या ज्या आव्हानांचा सामना करण्याचे नियोजन करत आहोत, त्यापेक्षा वेगळ्या आव्हानांना तोंड देण्याची अपरिहार्यता, हीच शाश्वत गोष्ट आहे. भारत महत्त्वाच्या आर्थिक परिवर्तनाच्या कालखंडातून प्रवास करत आहे आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येण्याच्या प्रयत्नात आहे. हा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणातील कुशल मनुष्यबळाच्या आधारावर आहे, ज्याला मोदी सरकारच्या अनुकूल धोरणांचा पाठिंबा आहे. जागतिक आर्थिक मंचावर एक प्रमुख भूमिका बजावण्यासाठी प्रयत्नशील असताना, भारताने स्वतःला एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे. हा दृष्टिकोन साकारण्यासाठी, संरक्षण उत्पादन क्षेत्राचा मोठा विकास महत्त्वाचा आहे. यातून केवळ सशस्त्र दलांच्या आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट साध्य होणार नसून, देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासालाही बळ मिळेल.

संरक्षण उत्पादन धोरण आणि IDEX (संरक्षण उत्कृष्टतेसाठी नवोन्मेष), टीडीएफ (तंत्रज्ञान विकास निधी) यांसारखे प्रमुख कार्यक्रम आणि उपक्रम या परिवर्तनाच्या प्रवासातील प्रमुख घटक आहेत. IDEX, एक अल्प आणि मध्यम मुदतीची रणनीती म्हणून सादर करण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते DefExpo २०१८ दरम्यान त्याचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला. संरक्षण उत्कृष्टतेसाठी नवोन्मेषाची चौकट काळजीपूर्वक तयार करण्यात आली आणि त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने त्याला मंजुरी दिली. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (डीआयओ) ही विभाग ८ ची कंपनी म्हणून स्थापन करण्यात सआली. कंपनी कायदा २०१३ च्या नियमांनुसार “ना-नफा” संस्था म्हणून कार्यरत असलेल्या या कंपनीला सरकारने ५ वर्षांच्या कालावधीसाठी ४९८.८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ३०० स्टार्टअप्स, एमएसएमई आणि वैयक्तिक नवोन्मेषींना महत्त्वाचे पाठबळ प्रदान करण्यासाठी हे अर्थसहाय्य देण्यात आले असून, यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील नवोन्मेष आणि आत्मनिर्भरतेच्या उद्दिष्टपूर्तीला बळ मिळेल.

भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस (हवाई) क्षेत्रांसाठी डिझाइन केलेल्या नवोन्मेषी तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देणे हा या उपक्रमांचा प्राथमिक उद्देश आहे, ज्यामुळे त्याची जलद अंमलबजावणी होईल. याव्यतिरिक्त, संरक्षण आणि एरोस्पेस प्रकल्पांमधील सहयोगी प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, नवीन स्टार्ट-अप्ससह भागीदारी विकसित करणे हे याचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम सक्रिय सहभाग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण करायला प्रोत्साहन देईल आणि या क्षेत्रात सह-निर्मिती आणि सह-नवोन्मेषाच्या संस्कृतीला चालना देईल. एकूणच, हा उपक्रम स्टार्ट-अप्समधील नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांना भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस परिसंस्थेमध्ये एकरूप करण्याचा तसेच या महत्त्वाच्या क्षेत्रांचा विकास करून प्रगतीला चालना देण्याचा प्रयत्न करतो.

तंत्रज्ञानातील सुधारणेचा वेग पाहता, विशेषत: युद्धाच्या संदर्भात, भारतीय नौदलाला तांत्रिक प्रगतीमध्ये आघाडीवर राहण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीय नौदलाने स्प्रिंट उपक्रमाद्वारे नवोन्मेषाचा अवलंब केला आहे. नवीन उपकरणे समाविष्ट करून जागतिक स्तरावर तैनातीसाठी स्वायत्त आणि चालकदलरहित (क्रूलेस) तंत्रज्ञान तयार करण्यात आले आहे. भारतातील मोठ्या खासगी कंपन्या दैनंदिन मथळे बनवत असताना, मेक इन इंडिया उपक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यात मोठे संरक्षण समूह महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, हे नोंद घेण्याजोगे आहे. तथापि, भारतीय सशस्त्र दल, विशेषत: भारतीय नौदलाकडून सक्रिय भागधारकांच्या सहाय्याने सुलभ स्टार्ट-अप आणि एमएसएमईना उल्लेखनीय समर्थन मिळत आहे. भारतातील संरक्षण क्षेत्र हे औद्योगिक परवाना, सुरक्षाविषयक मंजुरी आणि संरक्षण खरेदी धोरणांसह कठोर नियम आणि मानकांच्या आधारावर काम करते. ही आव्हाने असूनही समर्थन, मार्गदर्शन आणि वापरकर्त्यांच्या अभिप्रायासह संरक्षण स्टार्ट-अपसाठी प्रक्रिया वेगवान केली जात आहे. जहाजबांधणी उद्योग, हे एक कौशल्यपूर्ण काम असून, यामध्ये मोठ्या संख्येने मनुष्यबळ गुंतवणुकीचा समावेश आहे, हे व्यासपीठ अधिक प्रगत झाल्यामुळे यामधील जटिलता वाढताना दिसत आहे. या जटिलतेमध्ये सागरी क्षेत्रासाठी योग्य दर्जाचे दिवे ते रडार, हेलिकॉप्टर ते पाण्याखालील दूर संवाद यंत्रणा आणि टॉर्पेडोपासून क्षेपणास्त्रांपर्यंत सर्व प्रकारच्या कंपन्यांची भागीदारी आवश्यक आहे.

इनोव्हेशन स्टार्ट-अप चॅलेंज (SPRINT)ने सुरुवातीपासूनच भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याने विविध प्रकारच्या स्टार्ट-अप्स, एमएसएमई, नवोन्मेषी, थिंक टँक आणि शैक्षणिक संस्थांना आकर्षित केले आहे, ज्याने भारताचे वाढते स्टार्ट-अप परिप्रेक्ष समृद्ध केले आहे आणि संरक्षण क्षेत्रातील नवोन्मेषाला प्रोत्साहन दिले आहे.

भारताच्या स्टार्ट-अप इकोसिस्टीमवरील स्प्रिंटचा प्रभाव सहभागी कंपन्यांच्या भौगोलिक वितरणामधून आणि ए अँड डी स्टार्ट-अपच्या २०२२ नंतरच्या वाढीमधून दिसून येतो. समस्या विधानांचे वर्गीकरण स्प्रिंटच्या नावीन्यपूर्णतेची व्यापकता अधोरेखित करते. हा कार्यक्रम स्टार्ट-अप, सरकारी संस्था आणि संरक्षण संस्था यांच्यातील सहयोगी प्रयत्नांच्या सामर्थ्याचे उदाहरण देतो, जे केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देत नाही, तर जागतिक संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील एक उगवती शक्ती म्हणून भारताचे स्थान मजबूत करते.

‘विकसित भारत @२०४७’ हे स्वातंत्र्याच्या १००व्या वर्षांत २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेला मूर्त रूप देते. या दृष्टिकोनामध्ये आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता आणि सुशासन यासह विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, भारतीय नौदलाने २०४७ पर्यंत पूर्णपणे ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी स्वतःला वचनबद्ध केले आहे, हा एक धोरणात्मक निर्णय आहे, जो आधीच पूर्ण क्षमतेने कार्यरत असलेल्या भारतीय नौदलाला मोठे प्रोत्साहन देत आहे. यामुळे तरुण पिढीसाठी कर्मचारी आणि रोजगार निर्माते अशा दोन्ही संधी निर्माण झाल्या आहेत.

नौदल प्रमुख ॲडमिरल हरी कुमार यांनी आत्मनिर्भरतेचे प्रयोजन स्पष्ट करताना केवळ तांत्रिक विकास साधण्यावर समाधानी न राहता, त्यापलीकडे प्रगती करण्याची गरज अधोरेखित केली होती. भारतीय नौदलाने भविष्यात मानवरहित आणि स्वायत्त क्षमतांचा समावेश करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे भारतीय सागरी क्षेत्रातील धोक्यांचा प्रभावीपणे सामना करण्याची नौदलाची क्षमता वाढेल. स्प्रिंट विजेत्यांना केवळ भारतातूनच नव्हे, तर परदेशातूनही मागणी (ऑर्डर) मिळत आहे, हे या दृष्टिकोनाचा मूर्त परिणाम प्रतिबिंबित करतात. संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे की, “सामर्थ्यवान सैन्य केवळ सीमा सुरक्षित करत नाही, तर देशाची संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचे रक्षण करते. एक मजबूत, स्वावलंबी आणि समृद्ध राष्ट्र तयार करणे हे ध्येय आहे, जे स्वतःच्या तसेच मित्र देशांच्या गरजा पूर्ण करेल. हा नवजागरणाचा काळ आहे. भारताला जागतिक महासत्ता म्हणून पुन्हा प्रस्थापित करण्याची हीच वेळ आहे.” हा दृष्टिकोन आकांक्षी आणि प्रेरणादायी असून, सहयोगी प्रयत्नांनी तो साध्य करता येण्याजोगा आहे. (लेखकाविषयी : कमांडर राहुल वर्मा (निवृत्त) हे भारतीय नौदलाचे माजी कमांडर (टीडीएसी) आहेत. त्यांना विविध विमानांच्या उड्डाणाचा अनुभव असून, नौदल एव्हिएटर म्हणून २१ वर्षे कार्य केले आहे.)