Home ताज्या घडामोडी Earthquake : पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के; जीवितहानी नाही

Earthquake : पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के; जीवितहानी नाही

Earthquake : पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के; जीवितहानी नाही

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले. कोयना धरणापासून २० किलोमीटर अंतरावर हा भूकंप ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा झाला. धरण सुरक्षित आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून ५ किमी खाली होता. कोल्हापूरपासून ७६ किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही.

सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह जवळच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, गेल्या महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. २९ जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवले आणि जमीनही हादरली होती. तीन वर्षांपूर्वी असाच काहीसा धक्का सावंतवाडी शहरासह परिसरात बसला होता. यावेळी माडखोलसह दाणोली, सातोळी, बावळट, अगदी बांद्यापर्यंत जमीन हादरल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले होते.