Home क्रीडा फलंदाजीत कमी पडलो!

फलंदाजीत कमी पडलो!

फलंदाजीत कमी पडलो!

दुसऱ्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पंड्याची प्रतिक्रिया

गयाना (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात रविवारी भारतीय संघाची फलंदाजी चांगली झाली नाही. फलंदाजीत टीम इंडिया कमी पडल्याची प्रतिक्रिया भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने दिली.

हार्दिक म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचे, तर आमची फलंदाजी चांगली झाली नाही. आम्ही आणखी चांगली फलंदाजी करू शकलो असतो. १६०+ किंवा १७० धावा या त्या खेळपट्टीवर खूप महत्त्वाच्या होत्या. वेस्ट इंडिजचे फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत, त्यामुळे फिरकीपटूंना गोलंदाजी करणे खूप कठीण होऊन बसले. निकोलस पूरनने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यामुळे वेस्ट इंडिजच्या बाजूने सामना फिरला. मात्र, तो बाद होताच युजवेंद्र चहल आणि रवि बिश्नोईने भारताला सामन्यात परत आणले. पण शेवटच्या जोडीने विंडीजला विजय मिळवून दिला. जर याच ठिकाणी १७० धावसंख्या असती तर आम्ही कदाचित सामना जिंकला असता.

हार्दिक पुढे म्हणाला की, सध्याच्या टीम कॉम्बिनेशनमध्ये पहिल्या सात फलंदाजांवर मोठी धावसंख्या उभी करण्याची जबाबदारी आहे आणि ते तसे करतील असा विश्वास ठेवायला हवा. मात्र, फलंदाजांनी देखील संधीचा फायदा उठवणे गरजेचे असल्याचे पंड्या म्हणाला.

हार्दिकने तिलक वर्माचे कौतुक केले. तिलकच्या रुपाने डावखुरा फलंदाज चौथ्या क्रमांकावर येण्याने संघाला विविधता मिळते. हा त्याचा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना होता असे वाटत नाही. खेळपट्टीचा अंदाज घेऊन जर फलंदाजांनी फलंदाजी केली असती, तर आज ही वेळ आली नसती.