Home ताज्या घडामोडी Haryana : मणिपूरनंतर आता हरियाणा पेटले! जलाभिषेक यात्रेत जाळपोळ

Haryana : मणिपूरनंतर आता हरियाणा पेटले! जलाभिषेक यात्रेत जाळपोळ

Haryana : मणिपूरनंतर आता हरियाणा पेटले! जलाभिषेक यात्रेत जाळपोळ

गुरुग्राम : मणिपूर राज्यात पेटलेली आग विझलेली नसतानाच आता हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूहमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकल्याचे समोर आले आहे. नूहमधील मंदिरात जवळापास २५०० पुरुषांसह महिला आणि लहान मुले जीव मुठीत धरुन बसले आहेत.

यात्रेवर सोमवारी दगडफेक झाल्यानंतर हिंसाचार उसळला. नूह येथे लागलेल्या आगीत अनेक वाहने जळून खाक झाली. पोलीस ठाण्याला आग लावण्यात आली. याशिवाय या चकमकीत अनेक पोलीसही जखमी झाले आहेत. यासोबतच एका होमगार्डचाही मृत्यू झाला आहे.

अचानक उफाळून आलेल्या हिंसाचारात गाड्या, चार चाक्यांवर दगडफेक करुन आग लावण्यात आली. हिंसाचाराच्या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी परिस्थिती नियंतत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. यावेळी पोलिसांकडून हवेतही गोळीबारही करण्यात आला.

गुरुग्रामजवळील नूह परिसरात विश्व हिंदु परिषदेद्वारे बृजमंडळ जलाभिषेक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा गुरुग्राम-अलवर इथल्या राष्ट्रीय महामार्गावर आली तेव्हा तरुणांच्या टोळीने त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरु केली. त्यानंतर या हिंसाचाराने इतके रुद्र रुप धारण केले की, जमावाकडून शासकीय आणि खाजगी वाहनांना टार्गेट करत जाळपोळ सुरु केली.

हिंसाचारानंतर यात्रेतल्या जवळपास २५०० लोकांनी नल्हार महादेव मंदिरात जीव मुठीत धरुन बसले आहेत. मंदिरात बसलेल्या लोकांच्या गाड्या मंदिराच्या बाहेर आहेत. या मंदिर परिसरातून काढण्यात पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंसाचार उफाळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सुत्रांकडून घटनास्थळी गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. हिंसाचारामध्ये एकूण २० लोक जखमी झाले असून हिंसाचार रोखण्यासाठी या भागात जमावबंदीसह इंटरनेट बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.