Home ताज्या घडामोडी मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्याने कोल्हापुरातील दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्याने कोल्हापुरातील दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्याने कोल्हापुरातील दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

कोल्हापूर : मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्याने कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे येथील एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मधुकर दिनकर कदम व जयश्री असे या दुर्दैवी पती-पत्नीचे नाव आहे. आयुर्वेदिक औषध घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता त्यांच्या मुलींनी वर्तवली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडणगे येथील दिंडे कॉलनीत राहणारे कदम दाम्पत्य हे मूळचे शिवाजी पेठेतील आहेत. मधुकर कदम हे एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत. वर्षभरापूर्वी ते आपल्या दोन मुलींसह नवीन घरात राहायला आले होते. वय झाल्याने पती पत्नींना काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास सुरू झाला होता.

पंधरा दिवसांपूर्वी मधुमेहाचा त्रास वाढल्याने दोघांनीही मुक्त सैनिक वसाहत येथील एका डॉक्टरकडून आयुर्वेदिक औषध घेतले होते. आज सकाळी दोघांनी औषधी पावडर पाण्यात मिसळून घेतली. नंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले आणि त्यांच्या पत्नी स्वयंपाक करत होत्या. दरम्यान काही वेळातच जयश्री यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर काही वेळात त्या बेशुद्ध पडल्या. तर तिकडे दूध आणण्यासाठी गेलेल्या शिवपार्वती चौकातील डेअरीत मधुकर कदमही चक्कर येऊन पडले.

यावेळी नागरिकांनी कदम दाम्पत्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र खासगी डॉक्टरांनी दोघांनाही सीपीआरमध्ये पाठवण्यास सांगितले. सीपीआरमधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.