Home क्रीडा IPL कोहली, अक्षरसह ७ खेळाडू आज निघणार लंडनला

कोहली, अक्षरसह ७ खेळाडू आज निघणार लंडनला

कोहली, अक्षरसह ७ खेळाडू आज निघणार लंडनला

डब्ल्यूटीसीच्या फायनलसाठी भारत सज्ज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून ही स्पर्धा संपल्यानंतर दहा दिवसांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी होणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या फायनलच्या या लढतीसाठी भारतीय संघातील ७ खेळाडू उद्या मंगळवारी लंडनला रवाना होणार आहेत. विराट कोहली, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि आर अश्विन हे खेळाडू मंगळवारी लंडनला रवाना होणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र सध्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील शेवटचे काही सामने शिल्लक आहेत. त्यामुळे अन्य खेळाडू नंतर निघणार आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची टीम मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे रोहित शर्मा अंतिम सामन्याच्या एका दिवसानंतर म्हणजेच २९ मे रोजी लंडनला रवाना होऊ शकतो आणि उर्वरित संघ देखील त्याच्यासोबत जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियासोबत तीन नेट बॉलर्स जाणार असून त्यात अंकित चौधरी, आकाशदीप आणि यारा पृथ्वीराज यांचा समावेश आहे.