Home ताज्या घडामोडी ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने नव्या राजकीय चर्चाना उधाण

मुंबई : राष्ट्रवादीमधील आमदार व ठाकरे गटातील आमदार हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी महाबळेश्वर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांच्या वक्तव्याने नव्या राजकीय चर्चाना उधाण आले असून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात भूंकप होईल अशी बातमी समोर आली आहे.

खारघर घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवले जाईल, अशा चर्चाना उधाण आले होते. याबाबत मंत्री सामंत यांना विचारण्यात आले. यावेळी बोलताना सामंत म्हणाले, या सगळ्या निरर्थक चर्चा आहेत. असे काही नाही आहे.

उलट ठाकरे गटातली उरलेले १३ आमदार हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे २० आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच हा गौप्यस्फोट करतानाच चर्चा भरपूर होऊ शकतात पण ते सत्यात उतरले पाहिजे, असे उदय सामंत म्हणाले.

राज्यातील राजकारणात कधी काय होईल, हे कोणी सांगू शकत नाही. दररोज वेगवेगळ्या राजकीय घटना घडत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेले अनेक आमदार पुन्हा ठाकरेंच्या गटात परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. पक्ष सोडून गेलेले कुणी परत येणार असतील तर त्याबाबतचा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ घेतील, असे सूचक विधान ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. एकीकडे हे सगळे सुरू असताना आता दुसरीकडे मात्र उदय सामंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे.