Home ताज्या घडामोडी मुंबई-पुणे प्रवास महागणार; ‘एक्स्प्रेस-वे’वरील टोल दरात १ एप्रिलपासून १८ टक्के वाढ

मुंबई-पुणे प्रवास महागणार; ‘एक्स्प्रेस-वे’वरील टोल दरात १ एप्रिलपासून १८ टक्के वाढ

मुंबई-पुणे प्रवास महागणार; ‘एक्स्प्रेस-वे’वरील टोल दरात १ एप्रिलपासून १८ टक्के वाढ

चारचाकीसाठी ३२० तर बससाठी मोजावे लागणार ९४० रुपये

मुंबई : मुंबई – पुणे प्रवास १ एप्रिलपासून महागणार आहे. एक्स्प्रेस-वे’वरील टोल दरात वाढ करण्यात येणार असल्याने प्रवाशांचा प्रवास महागणार असल्याचे दिसून येत आहे. १ एप्रिलपासून द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

परिणामी चारचाकी वाहनाचा टोलचा दर २७० रुपये आहे तो १ एप्रिलपासून ३२० रुपये होणार आहे. म्हणजे नव्या दरात ५० रुपयांची वाढ होणार आहे. तर बससाठी आताचा टोल दर ७९७ असून ९४० रुपये भरावा लागणार आहे.

त्याचप्रमाणे टेम्पो, ट्रक, थ्री एक्सेल आणि एम एक्सेलच्या दरामध्येही वाढ होणार आहे. टोलच्या या दरवाढीमुळे वाहनचालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ हा दोन शहरांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. दरम्यान टोलमध्ये होणारी वाढ पाहता दर तीन वर्षांनी १८ टक्के टोल वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, २०२३ मधील टोलच्या दरात वाढ होत आहे.

टोलमधील दरवाढीमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. याआधी १ एप्रिल २०२० मध्ये अशीच वाढ करण्यात आली होती. मात्र १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर हे पाहता हे दर २०३० पर्यंत कायम असणार असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले आहे.

पुणे-मुंबई या मार्गावर अनेकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. दरम्यान वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या मालिकांमुळे ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ कायम चर्चेचा विषय ठरला आहे. टोल वाढ नित्यनियमाने केली जाते. यंदा होणारी वाढ पाहता सध्याच्या दरापेक्षा ५० ते ७० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०३० पर्यंतचे टोलचे दर

वाहन                          आत्ताचे दर                               १ एप्रिलपासूनचे दर
चारचाकी                            २७०                                        ३२०
टेम्पो                                ४२०                                        ४९५
ट्रक                                  ५८०                                        ६८५
बस                                  ७९७                                        ९४०
थ्री एक्सेल                          १३८०                                       १६३०
एम एक्सेल                         १८३५                                       २१६५

एक्स्प्रेस-वे अपघातांमुळे चर्चेत

संग्रहीत छायाचित्र

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वरील अपघातांच्या मालिकांमुळे आजवर अनेकांनी आपला जीव गमावला आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. दरम्यान या आधीही मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर यांनाही अपघातामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान अपघात झाल्यास वाहतूक कोंडीमुळे या मार्गावर रुग्णवाहिका पोहोचण्यासाठीही विलंब होतो. त्यामुळे अनेकदा रुग्णांना वेळेवर उपचार करणे शक्य होत नाही.