Home क्रीडा अश्विनला दिल्लीचा कर्णधार करा

अश्विनला दिल्लीचा कर्णधार करा

अश्विनला दिल्लीचा कर्णधार करा

मुंबई (प्रतिनिधी): आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्सने ऑफस्पिनर आर. अश्विनला दिल्लीचा कर्णधार करा, अशी सूचना माजी सलामीवीर, खासदार गौतम गंभीरने फ्रँचायझीला केली आहे.

पुढील मोसमात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने संघाचे नेतृत्व करावे. आयपीएलचा मोठा लिलाव पुढील हंगामापूर्वी होणार आहे. अशा स्थितीत दिल्लीचे कोणते खेळाडू त्यांच्यासोबत कायम राहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मी अश्विनच्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक आहे. तो जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. जर तुम्ही संपूर्ण लाईनअप पाहिली तर हा एक विचित्र निर्णय असू शकतो, पण जर मी तिथे असतो, तर मी त्याला पुढच्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवले असते, असे गंभीरने म्हटले आहे.

गौतम गंभीर हा कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएल जेतेपद मिळवून देणारा कर्णधार आहे. त्यानंतर तो २०१९ मध्ये पुन्हा दिल्लीच्या संघात परतला. या मोसमात त्याने अर्ध्यातच संघाचे कर्णधारपद सोडले आणि श्रेयस अय्यर कर्णधार झाला.

दिल्लीने सलग तिसऱ्यांदा आयपीएल प्ले-ऑफ फेरी गाठली पण तीनही वेळा जेतेपद मिळवण्यात ते अपयशी ठरले. श्रेयस अय्यरने २०१९ आणि २०२० मध्ये या संघाचे कर्णधारपद भूषवले, तर यंदाच्या मोसमात रिषभ पंतला कर्णधार करण्यात आले, कारण अय्यर हंगामापूर्वी जखमी झाला होता. या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात पंतला कर्णधारपद मिळाले. अय्यर दुसऱ्या टप्प्यात परतला पण तरीही पंतला कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले.